Publish Date: Wed, 20 Nov 2019 (15:30 IST)
Updated Date: Wed, 20 Nov 2019 (15:34 IST)
'आरबीआय चोर है' अशी घोषणाबाजी पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी केल्याचं दृश्यं पाहायला मिळालं. तुम्हाला तातडीने पैसे हवे असतील तर रिझर्व्ह बँकेच्या प्रशासकांकडे अर्ज करा, असं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) खातेधारकांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.
वैद्यकीय गरजा, मुलांचे दाखले किंवा अन्य आपात्कालीन कारणास्तव खातेधारकांना तातडीने जास्त पैसे हवे असतील तर त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या प्रशासकांकडे अर्ज करावा असे निर्देश न्यायालयानं दिलेत.
दरम्यान मंगळवारच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी थेट आरबीआय या घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप केला. संतापलेल्या खातेधारकांनी न्यायालय परिसरात 'आरबीआय चोर है' अशी घोषणाबाजी केली. खंडपीठाने मात्र याचिकाकर्त्यांच्या वकिलांना समज देत आरबीआयचं प्रतिज्ञापत्र आणि कायदे नीट अभ्यासून 4 डिसेंबरच्या सुनावणीत युक्तिवाद करण्याचे निर्देश दिले आहेत.