Publish Date: Tue, 05 Mar 2019 (14:50 IST)
Updated Date: Tue, 05 Mar 2019 (14:52 IST)
पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. देशातील प्रत्येक नागरिकाने या घटनेचा तीव्र निषेध करत संताप व्यक्त केला. इतकंच नाही तर सिनेसृष्टीनेदेखील या हल्ल्यानंतर कठोर निर्णय घेत पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी केली. या मागणीचं अनेक कलाकारांनी समर्थन केलं आहे, तर काहींनी प्रतिक्रियाच देणं टाळलं आहे. या सार्यामध्ये अभिनेता रणवीर सिंहने मात्र 'कलेच्या आणि राजकारणाच्या सीमा वेगळ्या असायला हव्यात', असं म्हटलं आहे. 14 फेब्रुवारीला जैश-ए-मोहमम्द या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 40 पेक्षा अधिक जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारतानेही पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच पाकिस्तानसोबतच्या व्यापारावर निर्बंधही लादण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी भारतातील सिनेअसोसिएशननेही पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. याविषयी बोलताना रणवीरने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असावी अशी जर शहीद जवानांच्या कुटुंबीयांना इच्छा असेल तर माझा त्यांना पाठिंबा असल्याचं म्हणाला. राजकारणाला देशाच्या सीमा असतात. मात्र या सीमा कला किंवा क्रीडा क्षेत्राला नसतात. त्यामुळे राजकारणाला कधीही कला किंवा क्रीडा क्षेत्राशी जोडू नये. कला, क्रीडा आणि राजकारण या गोष्टी काय वेगळ्या ठेवायला हव्यात. पण जर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असावी ही शहीद जवानांच्याकुटुंबीयांची मागणी असेल तर मी या बंदीला कधीच विरोध करणार नाही, असं रणवीर म्हणाला.