Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत ३० हजाराने वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी ३६ हजार ९०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ११२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १७ हजार १९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६ लाख ३७ हजार ७३५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५३ हजार ९०७ जणांचा मृत्यू झाला असून २३ लाख ५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.२ टक्के एवढे झाले आहे. तर मृत्यूदर २.४ टक्के एवढा आहे. एकंदरीत राज्यातील रिकव्हरी रेट कमी होत असून मृत्यूदरात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९० लाख ३५ हजार ४३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६ लाख ३७ हजार ७३५ (१३.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४ लाख २९ हजार ९९८ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर १४ हजार ५७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. तर राज्यातील सध्याची ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या २ लाख ८२ हजार ४५१ इतकी आहे.