Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
राज्यात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागल्याचे दिसून येत आहे. राज्यात गुरुवारी 9 हजार 855 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर, 42 रुग्णांचा मृत्यू झाला.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 21 लाख 79 हजार 185 एवढी झाली आहे. त्यापैकी 20 लाख 43 हजार 349 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 6 हजार 559 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.77 टक्के झाले आहे.
सध्या राज्यात एकूण 82 हजार 343 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात 42 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात 52 हजार 280 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.40 टक्के एवढा आहे. राज्यात 3 लाख 60 हजार 500 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 701 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
पुण्यात सर्वाधिक 16 हजार 491सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल नागपूर मध्ये 10 हजार 132, मुंबई 8 हजार 594 तर, ठाण्यात 8 हजार 810 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.