Publish Date: Mon, 28 Dec 2020 (08:43 IST)
Updated Date: Mon, 28 Dec 2020 (08:45 IST)
राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२९ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर मृत्युदर २.५७ टक्के इतका आहे. राज्यात रविवारी २,१२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत १८ लाख ९ हजार ९४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात दिवसभरात ३,३१४ रुग्ण व ६६ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ लाख १९ हजार ५५० झाली असून, एकूण कोरोना बळी ४९,२५५ झाले आहेत. राज्यात ५९,२१४ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत रविवारी ४९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत २ लाख ७० हजार ६२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला असून, २० ते २६ डिसेंबरपर्यंत मुंबईत रुग्णवाढीचा दर ०.२१ टक्के असल्याची नोंद झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले, तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३७२ दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईत रविवारी ५७८ रुग्ण आणि ८ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ९० हजार ९१४ वर पोहोचली आहे, तर मृतांची एकूण संख्या ११ हजार ७६ इतकी झाली आहे. सध्या शहर उपनगरात ८ हजार ३५५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.