Publish Date: Thu, 29 Apr 2021 (15:38 IST)
Updated Date: Thu, 29 Apr 2021 (15:41 IST)
संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार उडाला असताना महाराष्ट्रात मात्र अद्यापही भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा पंधरा दिवसांसाठी लॉकडाउन वाढविला असून 15 मेपर्यंत तो लागू राहणार आहे. तसेच लसीकरणासह विविध उपाययोजना सुरू असून आता 18 वर्षावरील सर्वांनाच लसीकरण याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. परंतु लसीकरणाचा वेग मंदावला तर कोरोनाची तिसरीला येऊ शकते, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
अपुऱ्या लस उपलब्धतेमुळे महाराष्ट्रात दि. 1 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना लसी देणे सुरू करणार नसल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच महाराष्ट्राला लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या लस नसल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाची गती कमी झाली आहे. जेव्हा एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोक लसीकरण करतात तेव्हाच कोविड -१९ योग्य प्रकारे नियंत्रित केले जाऊ शकते.
दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रात नऊ कोटी लसींपैकी फक्त दिड कोटी लोकांना लस देण्यात आली आहे, ती खूपच कमी आहे. जर आपण लसीकरण गती वाढविले नाही, तर जेव्हा लोक नोकरी किंवा इतर कामांसाठी बाहेर पडतात, तेव्हा कोविड -१९ ची तिसरी लाट येऊ शकते.
डिसेंबरमधील कोरोना प्रभाव कमी झाल्यामुळे लोक बेफिकीर झाले आणि कोविड -१९ ची दुसरी लाट फेब्रुवारीपासून सुरू झाली. आपण मोठ्या प्रमाणावर लस दिली नाही तर तिसर्या लाटेला आमंत्रण ठरणार आहे.
राज्यात एप्रिलमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची 15 लाख 53 हजार 922 रुग्णांची नोंद झाली असून 11 हजार 281 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र सरकारला 20 मेपूर्वी भारत बायोटेक किंवा सीरम इन्स्टिट्यूटकडून लस मिळण्याची शक्यता नाही.