Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
हिंदू धर्मात गणपतीला महत्वाचे स्थान आहे. सर्व शुभकार्यात प्रथम गणपतीचे पूजन केले जाते. शिव-पार्वतीचा पुत्र गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते. गणपतीच्या जन्माच्या वेगवेगळ्या दंतकथा आहेत.
एके दिवशी पार्वती आंघोळीसाठी गेली असता तिने आपल्या अंगावरील मळातून एका मुलाची निर्मिती केली व त्याला पहारा देण्यास सांगितले. काही वेळाने तिथे भगवान शंकर आले. त्यांना या मुलाने आत जाण्यापासून रोखले.
त्यामुळे चिडलेल्या शंकराने त्याचे मुंडके उडवले. हे पार्वतीला कळाल्यानंतर तिने शंकराला त्या मुलाला पून्हा जिवंत करण्यास सांगितले. पण त्याचे मुळ मुंडके न सापडल्याने शंकराने हत्तीचे मुंडके लावले. तेव्हापासून त्या मुलाचे नाव गणपती असे पडले.
चार हात व हत्तीचे डोके असलेल्या गणपतीचे उंदिर हे वाहन आहे. पूराणकाळात दैत्यांच्या आक्रमणापासून गणपतीने देवांचे रक्षण केले होते. गणपती हा देवांचा सेनापती मानला जातो. त्यामुळे विघ्नहर्ता (संकटनाशक) म्हणूनही त्याची पूजा केली जाते.
गणपतीला दुर्वा आवडतात. त्यामुळे त्याच्या पूजेत त्यांचा वापर हमखास केला जातो. मोदक हे त्याचे आवडते खाद्य आहे.
रिद्धी व सिद्धी या गणपतीच्या दोन पत्नी आहेत. देशभरात व विशेषतः महाराष्ट्रात गणेश चतुर्थीपासून पुढे दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. परदेशातही मोठ्या भक्ती भावाने गणपतीची पूजा केली जाते.
अष्टविनायक
महाराष्ट्रात गणपतीची आठ ठिकाणे आहेत. त्यांना अष्टविनायक म्हटले जाते. ही सर्व ठिकाणे पुणे परिसरात आहेत. मोरगावचा मोरेश्वर, सिध्दटेकचा सिध्दिविनायक, पालीचा बल्लाळेश्र्वर, महाडचा वरदविनायक, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, ओझरचा विघ्नहर, रांजणगावचा महागणपती ही अष्ठविनायकाची ठिकाणे आहेत.