Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीरामविजय - अध्याय ३५ वा

Webdunia
अध्याय पस्तीसावा - श्लोक १ ते ५०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
देहबुद्धिलंका घेऊन ॥ मारिला अहंकृति रावण ॥ स्थापूनि भाव बिभीषण ॥ छत्र धरिलें तयावरी ॥१॥
ज्ञानकळा जनकतनया ॥ भेटली येऊन रघुराया ॥ मग स्वानंदविमानीं बैसोनियां ॥ आत्माराम चालिला ॥२॥
लागला वाद्यांचा गजर ॥ राघवकीर्ति गाती वानर ॥ योजनें दोन सहस्र ॥ विमान तेव्हां उंचावलें ॥३॥
जैसा पोर्णिमेचा रोहिणीवर ॥ पश्चिमेस जाय सत्वर ॥ कीं समुद्रीं जहाल थोर ॥ लोटित समीर वेगेंसी ॥४॥
तैसें वेगीं जात विमान ॥ घंटा वाजती घणघण ॥ दिव्यमणिमयप्रभा घन ॥ उत्तरपंथें जातसे ॥५॥
ऐसा जात रविकुळमंडण ॥ जो असुरकुळकानन -दहन ॥ वामांगीं अवनिजागर्भरत्न ॥ सौदामिनी मेघीं जैसी ॥६॥
तयेप्रति बोले रघुनंदन ॥ कांते खाली पाहें विलोकून ॥ लंका दिसे दैदीप्यमान ॥ हेमवर्ण विशाळ ॥७॥
पैल पाहें निकुंभिला ॥ येथें शक्रजित सौमित्रें मारिला ॥ आम्ही राहिलों होतों तेच सुवेळा ॥ प्राणवल्लभें विलोकी ॥८॥
पैल पाहे रणमंडळ ॥ येथें युद्ध जाहलें तुंबळ ॥ आटिले राक्षस सकळ ॥ महासबळ पराक्रमी ॥९॥
वज्रदंष्ट्री विरूपाक्ष अकंपन ॥ मत्त महामत्त प्रहस्त प्रधान ॥ भयानक विशाळ कुंभकर्ण ॥ येथेंच आटले इंदुवदने ॥१०॥
देवांतक नरांतक महोदर ॥ कुंभ निकुंभ त्रिशिरा महाअसुर ॥ ते येथें आटले समग्र ॥ जनकतनये पाहें पां ॥११॥
युद्ध करूनि सप्त दिन ॥ येथेंच पडला दशवदन ॥ हा समुद्र पाहें विलोकून ॥ सेतु नळें बांधिला ॥१२॥
पैल उत्तरतीरीं दर्भशयन ॥ येथें समुद्र भेटला येऊन ॥ पुढें मलयाचळ विंध्याद्रि पूर्ण ॥ किष्किंधा पाहें राजसे ॥१३॥
पैल पाहे पंपासरोवर ॥ येथें भेटला वायुकुमर ॥ पैल स्थळीं वाळिवीर ॥ सुग्रीवकैवारें वधियेला ॥१४॥
येथें शबरीचा केला उद्धार ॥ येथें कबंध वधिला साचार ॥ पैल दिसे गोमतीतीर ॥ खर दूषण वधिले येथें ॥१५॥
पुढें पंचवटी पाहें गजगमनें ॥ तेथूनि तुज नेलें द्विपंचवदनें ॥ ऋषीचें आश्रम पद्मनयने ॥ पाहं गौतमीतटींचे ॥१६॥
शरभंग सुतीक्ष्ण मंदकर्णीं ॥ हा सिंहाद्रि राजसे पाहें नयनीं ॥ येथें दत्तात्रेय अनुसूया अत्रिमुनि ॥ भेटलीं होती पाहे पां ॥१७॥
हा अगस्तीचा आश्रम पाहें ॥ पुढें चित्रकूटी दिसताहे ॥ भारद्वाजआश्रम जनकतनये ॥ पुढें तीर्थराज प्रयाग ॥१८॥
पैल नंदिग्राम दिसत ॥ तेथें प्राणसखा आहे भरत ॥ पैल श्रृंगेवरीं महाभक्त ॥ किरात गुहक वसतसे ॥१९॥
खंजनाक्षी पाहें सदर ॥ शरयूतीरीं अयोध्यानगर ॥ घवघवीत परम सुंदर ॥ वास्तव्य स्थळ आमुचें ॥२०॥
परमस्नेहादरेंकरूनी ॥ जानकीस दावी चापपाणी ॥ तों अगस्तीचे आश्रमीं मोक्षदानी ॥ क्षणएक राहूं इच्छित ॥२१॥
रामें आज्ञापितां विमान ॥ खालीं आलें न लगतां क्षण ॥ पद्माक्षीरमण तेव्हां वचन ॥ पद्माक्षीरप्रति बोलत ॥२२॥
आम्हां भेटेल घटोद्भवमुनि ॥ तुज लोपामुद्रा नेईल सदनीं ॥ आणिकही ऋषिपत्न्या मिळूनी ॥ तुज पुसतील साक्षेपे ॥२३॥
रावणें तुज नेले कैसे रीतीं ॥ कैसा लंकेसी आला रघुपति ॥ पुसेल कुंभसंभवसती ॥ कथा जैसी जाहल ते ॥२४
सांगे सकळ वर्तमान ॥ परी जें केलें सागर बंधन ॥ ही कथा तियेलागून ॥ सर्वथाही सांगू नयेचि ॥२५॥
हे कथा सांगशील पूर्ण ॥ तुज ती आणील हीनवण ॥ ऐसे सांगोन राघवें विमान ॥ ऋषिआश्रमीं उतरिले ॥२६॥
होतसे वाद्यांचा गजर ॥ दणाणलें तेणें अंबर ॥ शिष्य धांवून सत्वर ॥ अगस्तीप्रति सांगती ॥२७॥
स्वामी विमान आलें पृथ्वीवरी ॥ भरलें रीसवानरीं ॥ तों अगस्ति उठिला झडकरी ॥ म्हणे रघुवीर पातला ॥२८
मग शिष्य घेऊन अपार ॥ रामासी सामोरा जाय सत्वर ॥ लवलाहीं आश्रमाबाहेर ॥ कलशोद्भव पातला ॥२९॥
ऋृषिमेळा राम देखतां ॥ उतरला विमानाखालता ॥ पुढें येतां कमलोद्भवपिता ॥ कलशोद्भवे देखिला ॥३०॥
अगस्तीस न धरवें धीर ॥ भूमंडळ क्रमीत सत्वर ॥ तंव रघूत्तमें नमस्कार ॥ साष्टांग घातला ऋषीतें ॥३१॥
अगस्तीनें धांवोनि त्वरित ॥ हृदयीं धरिला रघुनाथ ॥ जैसा वाचस्पति आलिंगित ॥ शचीवरासी आदरें ॥३२॥
सवेंच सौमित्रासी दिधलें आलिंगन ॥ तों रघूत्तम बोले हांसोन ॥ आजि आश्रम सोडून ॥ कां स्वामी आलेत बाहेरी ॥३३॥
मागें अरण्यकांडीं कथा गहन ॥ सीता घेऊनि गेला द्विपंचवदन ॥ तेव्हां परतोन रामलक्ष्मण ॥ अगस्तिआश्रमा पैं आले ॥३४॥
ते वेळीं अगस्तीनें जाणोन ॥ घेतले नाहीं रामदर्शन ॥ परतविलें दारींहून ॥ दोघे दशरथी ते काळीं ॥३५॥
ती गोष्ट आठवूनि रघुपति ॥ म्हणे तोच मी राम तूं अगस्ति ॥ तैं अनादर आतां प्रीति ॥ विशेष दिसे विप्रोत्तमा ॥३६॥
ऐसें बोलता सीताधव ॥ प्रत्युत्तर देत कलशोद्भव ॥ तैं स्त्रीरहित तूं राघव ॥ नाहीं वैभव तेधवां ॥३७॥
तो विपरीत काळ जाणोन ॥ नाहीं घेतले तुझे दर्शन ॥ आतां तूं स्त्रीयुक्त सीतारमण ॥ आलों म्हणोन सामोरा ॥३८॥
स्त्रीस अवघे देती मान ॥ तूं निर्विकार रघुनंदन ॥ मानापमानाविरहित जाण ॥ सच्चिदानंद परब्रह्म तूं ॥३९॥
तूं अज अजित आप्तकाम ॥ निरुपाधिक निर्गुण अनाम ॥ नाना विकार सम विषम ॥ स्त्रीचे सर्वही राघवा ॥४०॥
ऐकोनि अगस्तीचें उत्तर ॥ आनंदमय झाला रघुवीर ॥ मग आश्रमाप्रति सीतावर ॥ कलशोद्भव नेता जाहला ॥४१॥
तों ते लोपमुद्रा येऊन ॥ जनकजेसी करीं धरून ॥ गेली आश्रमांत घेऊन ॥ करूनि पूजन पुसतसे ॥४२॥
विदेहहतनये तुजसी प्रीती ॥ अत्यंत करितो रघुपती ॥ किंवा विरक्त असे चित्तीं ॥ सांग स्थिति कैसी ते ॥४३॥
वनीं विचरतां रघुनंदन ॥ तोषवीत असें की तुझें मन ॥ तूं भागलीस म्हणोन ॥ समाधान करितो कीं ॥४४॥
याउपरी विदेहराजनंदिनी ॥ त्रिभुवनपतीची पट्टराणी ॥ श्रीरामप्रताप वाखाणी ॥ ब्रह्मानंदेकरूनियां ॥४५॥
म्हणे परम दयाळु रघुनाथ ॥ मजवरी स्नेह करी अत्यंत ॥ तूं म्हणसी स्त्रीलंपट बहुत ॥ जनकजामात तैसा नव्हे ॥४६॥
तरी अत्यंत दयाळु श्रीराम ॥ मजवरी स्नेह करी परम ॥ विरक्त सदा निष्काम ॥ रूप नाम नाही तया ॥४७॥
मज घेऊन गेला रावण ॥ दयासागर तो रघुनंदन ॥ करूनियां नाना प्रयत्न ॥ मज सोडविलें श्रीरामें ॥४८॥
तों लोपामुद्रा म्हणे सीते ॥ तुज कैसे नेलें लंकानाथें ॥ मग येऊन जनकजामातें ॥ सोडविलें कवणें रीतीं ॥४९॥
हर्षें सांगतसे जानकी ॥ म्यां इच्छिली मृगकंचुकी ॥ तें जाणोनि एकाएकीं ॥ अयोध्याप्रभु धांविन्नला ॥५०॥
 
अध्याय पस्तीसावा - श्लोक ५१ ते १००
मागें अतीथवेषें येऊन ॥ मज घेऊन गेला रावण ॥ माझिया वियोगें राम आपण ॥ वृक्षपाषाण आलिंगी ॥५१॥
मजनिमित्त राजीवनेत्र ॥ मित्र करोन चंडांशुपुत्र ॥ शक्रसुता वधोनि सर्वत्र ॥ कपिवीर सखे केले ॥५२॥
मग लोकप्राणेशनंदन ॥ धाडिला माझे शुद्धिलागोन ॥ तेणें जाळून लंकाभुवन ॥ रघुनंदन आणिला ॥५३॥
अष्टादशपद्में वानर ॥ संगें घेऊन आला श्रीरामचंद्र ॥ वेढूनियां लंकापुर ॥ युद्ध अपार पैं केलें ॥५४॥
संततीसमवेत ॥ रावण ॥ रणीं मारी रविकुळभूषण ॥ राज्यीं स्थापोनियां बिभीषण ॥ पुष्पकारूढ मग जाहले ॥५५॥
खालीं मी जों विलोकीं पूर्ण ॥ तंव अद्भुत केलें सेतुबंधन ॥ लंबायमान शतयोजन ॥ आणोनि पाषाण बांधिला ॥५६॥
समुद्र बांधिला पाषाणीं ॥ आश्चर्य मज वाटलें मनी ॥ हें जानकीनें विसरूनि ॥ सेतुचरित्र कथियेलें ॥५७॥
तों ते लोपामुद्रा बोलत ॥ काय सांगसी गोष्टी अद्भुत ॥ पाषाणीं बांधिला सरितानाथ ॥ काय पुरुषार्थ केला हा ॥५८॥
टाकूनियां एक शर ॥ कां शोषिला नाहीं सागर ॥ न लागतां क्षणमात्र ॥ माझे पतीनें प्राशिला ॥५९॥
ऐसें अगस्ति जाया बोलतां ॥ क्षणैक होय तटस्थ सीता ॥ म्हणे इणे उणे आणिलें रघुनाथा ॥ उत्तर आतां ईस देऊं ॥६०॥
म्हणे रघुत्तमाचा जातां बाण । सप्त समुद्र जातील आटून ॥ बिंदुमात्र नुरे जीवन ॥ जीव संपूर्ण मरतील ॥६१॥
रामापासीं वानरगण ॥ आहेत परम बळेंसंपन्न ॥ सप्त समुद्रांचें आचमन ॥ एकदांच करितील ॥६२॥
म्हणसी का केलें नाही आचमन ॥ तरी तुझ्या पतीचे मूत्र पूर्ण ॥ न शिवती वानरगण ॥ मग प्राशन केवीं करतील ॥६३॥
रघुनाथदास सोंवळे बहुत ॥ म्हणोनि तिहीं बांधिला सेत ॥ नाहींतरी सरितानाथ ॥ प्राशावया क्षण न लागता ॥६४॥
ऐसें बोलतां जनकतनया ॥ उगीच राहीली ऋषिजाया ॥ असो जानकीची पूजा करूनियां ॥ संतोषविलें ते काळीं ॥६५॥
अगस्तीनें पूजोनि रघुनंदना ॥ सवेंच ऋषींची घेऊनि आज्ञा ॥ पुष्पकीं बैसे आयोध्याराणा ॥ सीतेसहित ते काळीं ॥६६॥
पुष्पक उचलिलें तेथूनि ॥ चलिलें अयोध्यापंथ्ज्ञ लक्षोनि ॥ तों भारद्वाजआश्रमीं येऊनि ॥ उतरलें तेव्हां प्रयागीं ॥६७॥
मनांत विचारी रघुनंदन ॥ घ्यावें भारद्वाजदर्शन ॥ यालागीं उतरलें विमान ॥ इच्छा जाणून प्रभूची ॥६८॥
भारद्वाजासहित अपार ॥ चहूंकडून धांवती मुनीश्वर ॥ जैसें महानद्यांचे पूर ॥ सिंधूस जाती भेटावया ॥६९॥
रघुत्तमें खालतें उतरून ॥ नीमले समस्त ऋषिजन ॥ भारद्वाजें दिधलें आलिंगन ॥ प्रेमेंकरून तेधवां ॥७०॥
म्हण आजि धन्य ॥ दिवस ॥ घरा आला अयोध्याधीश ॥ जाहलीं वर्षें चतुर्दश चवदा दिवस अधिक पैं ॥७१॥
भारद्वाजें लक्ष्मण ॥ आलिंगिला प्रीतींकरोन ॥ ते दिवशीं रघुनंदन ॥ आपुले आश्रमीं राहविला ॥७२॥
मग तो जगदात्मा रघुनाथ ॥ स्नेहें हनुमंतासी सांगत ॥ म्हणे आम्ही आजि राहिलो येथ ॥ प्रीतीस्तव ऋषीच्या ॥७३॥
तरी पुढें जाऊनि त्वरित ॥ भरताप्रति करावें श्रुत ॥ श़ृंगवेरीं गुहक भक्त ॥ त्यासी हे विदित करावें ॥७४॥
ऐसी आज्ञा होतांचि पूर्ण ॥ वंदोनियां रघुवीरचरण ॥ वायुसुतें केले उड्डाण ॥ पित्याहून चपळत्वें ॥७५॥
गगनींहूनि अर्क उतरत ॥ तैसा गुहाकाश्रमीं हनुमंत ॥ येऊनि बोले अकस्मात ॥ अयोध्यानाथ आला कीं ॥७६॥
जो जगदानंद मूळकंद ॥ भरतहृदयारविंदमिलिंद ॥ रघुनाथ भक्तजनवरद ॥ जवळी आला जाणिजे ॥७७॥
परमानंद उदारघन ॥ अंतरंग मनमोहन ॥ परात्पर सोयरा जाण ॥ तो जवळीं आला कीं ॥७८॥
विश्वात्मक विश्वपाळक ॥ विश्वमनउदारक ॥ जनहृदयचाळक ॥ तों जवळी आला कीं ॥७९॥
ऐसें गुहके ऐकतां वचन ॥ वोसंडला आनंदेकरून ॥ धांवोनियां मारुतीचे चरण ॥ धरिले सद्रद होऊनियां ॥८०॥
ओळखोनियां परम भक्त ॥ त्यास हृदयी धरी हनुमंत ॥ गुहक मागुती लोळत ॥ चरणावरती मारुतीच्या ॥८१॥
म्हणे हें तन मन धन ॥ ओंवाळावें तुजवरून ॥ मग फळें सुमनें आणोन ॥ हनुमंत पूजिला गुहकें ॥८२॥
गुहकासी म्हणे हनुमंत ॥ चला नंदिग्रामासीं त्वरित ॥ स्वामी आला हें करूं श्रुत ॥ भरतप्रति जाऊनियां ॥८३॥
दोघेही उठिले ते क्षणीं ॥ एकमेकांचा हस्त धरूनि ॥ दोघेही भक्तशिरोमणि ॥ वेगेंकरूनि जाती ते ॥८४॥
तों नंदिग्रामीं भरत ॥ बोटानें दिवस मोजित ॥ म्हणे आतां न ये रघुनाथ ॥ चतुर्दश वर्षें लोटली ॥८५॥
भरत सर्वगुणी संपन्न ॥ तो भजनसमुद्रींचा मीन ॥ कीं वैरागरींचा पूर्ण ॥ अमोलिक मणि हा ॥८६॥
विवेकगंगेचा लोट थोर ॥ कीं ज्ञानाकाशींचा भास्कर ॥ कीं क्षमा धरिता सहस्रवक्र ॥ कीं सरोवर निश्चयाचें ॥८८॥
ऐसा तो भरत ते वेळीं ॥ म्हणे यावयाची सीमा जाहली ॥ राम प्रेमळाची माउली ॥ अजूनि दृष्टीं पडेना ॥८९॥
आतां हा देह टाकून ॥ धुंडीत जाईन रघुनंदन ॥ तत्काळचि कुंड रचून ॥ चेतविला अग्न कैकयीसुतें ॥९०॥
मग पाहिला दोन प्रहर ॥ अग्नींत घालावया शरीर ॥ सिद्ध जाहला भरत वीर ॥ परम प्रियकर रामाचा ॥९१॥
कुडासमीप उभा राहून ॥ अंतरीं आठविलें रामध्यान ॥ मुकुट कुंडलें आकर्ण नयन ॥ सुहास्यवदन सांवळे ॥९२॥
उडी घालावी जों आंत ॥ तों समीप जाला वायुसुत ॥ म्हणे आला आला रघुनाथ ॥ दशमुखांतक जगदात्मा ॥९३॥
आला सुरांचा कैवारी ॥ आला भक्तजनसाहाकारी ॥ भरत नेत्र उघडी तें अवसरीं ॥ तों मारुति घाली नमस्कार ॥९४॥
उष्णकाळ अत्यंत ॥ घायाळ रथ्ज्ञीं उदक मागत ॥ त्यासी जीवन पाविजे अकस्मात ॥ तैसा भरत सुखावला ॥९५॥
चकोर असतां क्षुधाक्रांत ॥ अवचित उगवे निशानाथ ॥ तैसा आनंदला भरत ॥ हनुमंतासी देखोनियां ॥९६॥
उचलोनियां परम प्रीतीं ॥ हृदयीं आलिंगिला मारुती ॥ म्हणे कोठें आहे रघुपति ॥ दावीं मज प्राणसखया ॥९७॥
प्राण जातां अमृत ॥ एकाएकीं घालिजे मुखांत ॥ तैसी शुभ वार्ता अकस्मात ॥ घेऊनि आलासी कपींद्रा ॥९८॥
मग हनुमंतासी बैसवून ॥ पुसिलें सकळ वर्तमान ॥ अमृतवर्षाव करीत घन ॥ तैसे येरें कथियेलें ॥९९॥
म्हणे कृपासिंधु रघुनंदन ॥ क्षणक्षणां तुमची आठवण ॥ करूनि म्हणे केव्हां जाईन ॥ भरताप्रति भेटावया ॥१००॥
 
अध्याय पस्तीसावा - श्लोक १०१ ते १५०
धन्य तुमचे बंधुपण ॥ शक्रपदातुल्य राज्य टाकून ॥ सकळ मंगलभोग त्यजून ॥ नंदिग्रामीं बैसलां ॥१॥
भरत म्हणे हो मारुति ॥ मृगजीवनीं बुडेल अगस्ति ॥ तमार्णवीं पडेल दिनपति ॥ दोष भागीरथी जरी लिंपे ॥२॥
शेष जरी भागेल धरितां क्षिती ॥ जरी मर्यादा टाकील सरितापती ॥ तरी राज्यवासना मारुती ॥ मज होईल जाणा पां ॥३॥
असो शत्रुघ्नासी म्हणे भरत ॥ तूं अयोध्येसी जाई त्वरित ॥ वसिष्ठ मातादि समस्त ॥ तयासी श्रुत करा वेगीं ॥४॥
अरुणोदय होतां सत्वर ॥ प्रजा सेना घेऊनि समग्र ॥ जगद्वंद्यासी सामोर ॥ गजरेंकरून येइंजे ॥५॥
ऐसी आज्ञा होतां शत्रुघ्न ॥ अयोध्येसीं गेला धांवोन ॥ टवटवीत प्रसन्नवदन ॥ सुमंतासी भेटला ॥६॥
म्हणे पाहता काय उठा त्वरित ॥ जवळी आलें श्रीरघुनाथ ॥ नंदिग्रामीं आला हनुमंत ॥ पुढें सत्वर सांगावया ॥७॥
हर्षें धांवत सुमंत ॥ आनंद न माये गगनांत ॥ दुंदुभी त्राहाटिल्या त्वरित ॥ आला रघुनाथ म्हणोनियां ॥८॥
दणाणिल्या राजभेरी ॥ नाद न समाये अंबरी ॥ शत्रुघ्नें राजसदनावरी ॥ कळस चढविला लवलाहें ॥९॥
सूर्योदयीं अकस्मात ॥ पृथ्वीवरी किरणें धांवत ॥ तैसी नगरीं प्रकटली मात ॥ आला रघुनाथ म्हणोनियां ॥११०॥
आळोआळी जन धांवती ॥ आंगीं रोमांच उभे राहाती ॥ सुख न समायें तयां चित्तीं ॥ नयनीं लोटती प्रेमबिंदु ॥११॥
सोळा पद्में दळभार ॥ सिद्ध जाहले तेव्हां सत्वर ॥ कुंजरभेरी चवदा सहस्र ॥ एकसरें ठोकिल्या ॥१२॥
शत्रुघ्न आणि सुमंत ॥ आले कौसल्येच्या सदनांत ॥ म्हणती माते आला रघुनाथ ॥ सीतासौमित्रासहित पै ॥१३॥
कौसल्या सुमित्रा दोघीजणी ॥ उचंबळल्या आनंदेकरूनी ॥ सुखाश्रु लोटले नयनीं ॥ बैसल्या वहनी सत्वर ॥१४॥
वसिष्ठापासीं जाऊन ॥ आनंदे सांगे शत्रुघ्न ॥ स्वामी आले जी रघुनंदन ॥ चला सत्वर सामोरे ॥१५॥
आला ऐकतां रघुनाथ ॥ स्वानंदें उचंबळे ब्रह्मसुत ॥ चतुरंग दळ समस्त ॥ नगराबाहेर निघालें ॥१६॥
विद्युत्प्राय ध्वज झळकती ॥ मकरबिरुदें पुढें चालती ॥ अष्टादश प्रजा धांवती ॥ नगराबाहेर सत्वर ॥१७॥
कैकयी सुमित्रा कौसल्या ॥ सुखासनारूढ जाहल्या ॥ मंगलवाद्यांच्या ध्वनि लागल्या ॥ तो सोहळा न वर्णवे ॥१८॥
वसिष्ठ शत्रुघ्न सुमंत ॥ दिव्य रथीं बैसले त्वरित ॥ आनंदमय जन समस्त ॥ श्रीरघुनाथ पहावया ॥१९॥
थोडीशी उरतां लग्नघडी ॥ वेगें धांवती वऱ्हाडी ॥ कीं गंगेचिया जवळीं थडी ॥ तृषाक्रांत करिती त्वरेनें ॥१२०॥
तैसें ब्रह्मानंदेकरून ॥ पुढें धांवती अयोध्येचे जन ॥ इकडे भरत सीताशोकहरण ॥ सूर्योदयीं उठियेले ॥२१॥
नित्यनेमातें सारून ॥ पुढें चालिले दोघेजण ॥ भरत म्हणे आजि धन्य नयन ॥ रामनिधान देखती ॥२२॥
इकडे भारद्वाजाची आज्ञा घेऊन ॥ पुष्पकीं बैसे रघुनंदन ॥ सत्वर चालिलें विमान ॥ अयोध्यापट्टण लक्षित ॥२३॥
तों भरतासी म्हणे हनुमंत ॥ ऊर्ध्वपंथें पाहा जी त्वरित ॥ भरत जों ऊर्ध्व विलोकित ॥ तों अद्भुत देखिलें ॥२४॥
भरत म्हणे हनुमंतासी ॥ हें काय असंभाव्य आकाशीं ॥ वाद्यें वाजती मानसीं ॥ आश्चर्य मज वाटतें ॥२५॥
हनुमंते म्हणे पुष्पकविमान ॥ सेनेसहित सीतारमण ॥ वरी येतात बैसोन । परम वेगें करूनियां ॥२६॥
ऐसें सांगतां वायुनंदन ॥ भरतें घातलें लोटांगण ॥ मागुती ऊर्ध्व वदन करून ॥ पुनः विमान विलोकी ॥२७॥
मागुती साष्टांग नमस्कार ॥ प्रेमें घाली भरत वीर ॥ चंद्राकडे पाहे चकोर ॥ ऊर्ध्वपंथें प्रीतीनें ॥२८॥
मारुतीचा हस्त धरून ॥ पुढें चाले कैकयीनंदन ॥ तों राघवइच्छेकरून ॥ पुष्पक उतरलें भूमीवरी ॥२९॥
सीतेसहित रघुनंदन ॥ विमानाखालीं उतरून ॥ अयोध्येसी साष्टांग नमन ॥ राजीवनयन करी तेव्हां ॥१३०॥
जन्मभूमी जान्हवी जननी ॥ सद्रुरुस्थळ पवित्र अवनी ॥ शिवहरिप्रतिमा संत देखोनी ॥ साष्टांग नमन करावें ॥३१॥
तपस्वी वेदज्ञ वृद्ध ब्राह्मण ॥ यज्ञप्रसाद ध्वज देखोन ॥ वंद्यद्रुम समाधिस्थान ॥ महापुरुष वंदावे ॥३२॥
सत्यव्रती श्रीरघुनाथ ॥ म्हणोनि अयोध्येसी नमस्कारित ॥ तों हनुमंतासमवेत ॥ जवळी भरत देखिला ॥३३॥
दाटला अष्टभावें करून ॥ घालीत येतसे लोटांगण ॥ श्रीरामवियोगेंकरून ॥ शरीर कृश जाहले ॥३४॥
भस्म लाविलें शरीरासी ॥ वल्कलें वेष्टित तो तापसी ॥ तैसा भरत देखोन मानसीं ॥ सीतावर कळवळला ॥३५॥
चरणीं क्रमीत भूमंडळ ॥ पुढें चाले तमालनीळ ॥ तान्हया वत्सालागीं स्नेहाळ ॥ धेनु हंबरत जैसी कां ॥३६॥
भरतें कैसें देखिले रघुनाथा ॥ बहुत दिवस गेला पिता ॥ तों कुमरें दृष्टीं देखतां ॥ धांवे जैसा स्नेहभरें ॥३७॥
तैसें भरतें धांवोनी ॥ मिठी घातली श्रीरामचरणीं ॥ की गेले धन देखतां नयनीं ॥ मिठी घाली जेविं लोभी ॥३८॥
कीं जन्मांधासी आले नयन ॥ कीं मृत्युसमयीं अमृतपान ॥ कीं दरिद्रीयास निधान ॥ अकस्मात प्राप्त जाहलें ॥३९॥
किंवा मारिता तस्करीं ॥ अकस्मात धांवला कैवारी ॥ तों जेविं सुखावे अंतरीं ॥ भरतासी तैसें वाटत ॥१४०॥
राघवें उचलूनि ते समयीं ॥ भरत दृढ धरिला हृदयीं ॥ दोघांचे नयनप्रवाही ॥ जलसरिता लोटल्या ॥४१॥
हरिहर दोघे भेटले ॥ शशिमित्र एकवट जाहले ॥ कीं क्षीराब्धीचे एवकटले ॥ लोट जैसे एकत्र ॥४२॥
कीं वेदांतग्रंथीचें अर्थ ॥ ऐक्यत्वा परस्परें येत ॥ तैसा दशमुखांतक आणि भरत ॥ एकपणें मिळाले ॥४३॥
सम संतोष समान प्रीति ॥ सोडावें हें न वाटे चित्तीं ॥ वियोगव्यथा दिगंतराप्रति ॥ जाती जाहली ते काळीं ॥४४॥
आलिंगन देऊन वेगळे होती ॥ परी अंतरीं नव्हेच तृप्ति ॥ तो सोहळा डोळां पाहती ॥ सुग्रीव आणि बिभीषण ॥४५॥
म्हणती भरत रघुपति ॥ अद्भुत दोघांची प्रीति ॥ एकास एक आवडती ॥ प्राणाहून पलिकडे ॥४६॥
बंधु साधु विरक्त भक्त ॥ चारी प्रकारें वंद्य भरत ॥ राज्य टाकूनि अरण्यांत ॥ चतुर्दश वर्षें बैसला ॥४७॥
नाहीं तरी आमुचें बंधुपण ॥ एकमेकांचे घेतले प्राण ॥ आतां रघुनाथ म्हणोन ॥ वंद्य जाहलों त्रिलोकीं ॥४८॥
परी धन्य वाळी आणि रावण ॥ त्यांचे विरोधप्रसंगेकरून ॥ सखा जोडला रघुनंदन ॥ सच्चिदानंदस्वरूप जो ॥४९॥
असो भरते प्रेमेंकरून ॥ वंदिले जनकजेचे चरण ॥ जैसें वत्स प्रीतीनें धांवोन ॥ रिघे धेनूचे कांसेसीं ॥१५०॥
 
अध्याय पस्तीसावा - श्लोक १५१ ते २२१
यावरी भरत आणि लक्ष्मण ॥ उचंबळती प्रेमरसेंकरून ॥ एकमेकांसी आलिंगन ॥ देते जाहले तेधवां ॥५१॥
सुग्रीव आणि बिभीषण ॥ उभयतांसी म्हणे रघुनंदन ॥ भरतासी क्षेमालिंगन ॥ द्यावें आतां ते समयी ॥५२॥
ऐसें ऐकतां दोघेजण ॥ भरतासी करिती साष्टांग नमन ॥ सुग्रीवासी उठवून ॥ भरतें आधी आलिंगिलें ॥५३॥
सवेंचि उठोनि बिभीषण ॥ हृदयीं धरिला प्रीतीकरून ॥ यावरी नळ नीळ वाळिनंदन ॥ जांबुवंतादि भेटले ॥५४॥
याउपरी गुहक भक्त ॥ तोही भरताऐसा व्रतस्थ ॥ तेणें प्रेमभरें दंडवत ॥ केलें तेव्हां रामासी ॥५५॥
सर्वासी समान रघुनाथ ॥ गुहकास तेव्हां हृदयीं धरित ॥ आनंद न माय गगनांत ॥ गुहकाचा ते काळीं ॥५६॥
मग गुहक भरतासमवेंत ॥ विमानीं बैसला रघुनाथ ॥ विमानी मागुनी उंचावत ॥ चालिले अद्भुत वायुवेगें ॥५७॥
क्षीराब्धितटीं जाऊन ॥ बैसे जैसा विष्णुवहन ॥ नंदिग्रामासमीप विमान ॥ उतरले तैसे ते वेळीं ॥५८॥
सीता आणि श्रीरघुनाथ ॥ पुष्पकाखालीं उतरत ॥ वानर असुर समस्त ॥ क्षण न लागतां उतरले ॥५९॥
राघव म्हणे पुष्पकासी ॥ आतां तुवां जावें कुबेरापासीं ॥ चिंतिल्या समयासीं ॥ आम्हापासीं येइंजे ॥१६०॥
ऐसी आज्ञा होता तात्काळिक ॥ ऊर्ध्वपंथे गेलें पुष्पक ॥ धनपतीपासीं जाऊनि देख ॥ स्थिर जाहलें ते काळीं ॥६१॥
नंदिग्रामासमीप अरण्यांत ॥ उतरता जाहला रघुनाथ ॥ वानर असुरदळ समस्त ॥ सेना तेथें बैसली ॥६२॥
इकडे अयोध्येबाहेर ॥ निघालें जाण दळ परिकर ॥ रथ श़ृंगारिले सुंदर ॥ आनंदें बहुत चालिले ॥६३॥
चवदा सहस्र कुंजरभेरी ॥ दणाणिल्या ते अवसरीं ॥ सोळा पद्में दळेसी झडकरी ॥ शत्रुघ्न येत भेटावया ॥६४॥
भरत म्हणे जी रघुराया ॥ शत्रुघ्न सुमंत आले भेटावया ॥ आणि माताही येती लवलाह्या ॥ होऊनियां स्नेहभरित ॥६५॥
जो तपें ज्ञानें समर्थ ॥ जो शांतिक्षमेचा पर्वत ॥ तो वसिष्ठमुनि सद्गुरुनाथ ॥ भेटावया येत त्वरेनें ॥६६॥
आणि अयोध्येचे सकळ ब्रह्मण ॥ अष्टादश प्रजा सैन्य संपूर्ण असंभाव्यं प्रातीकरून ॥ भेटावया येतसे ॥६७॥
तों सुमंत आणि शत्रुघ्न ॥ रथाखालीं उतरून ॥ अवलोकिता सीताजीवन ॥ लोटांगण घालिती ॥६८॥
देखोनि शत्रुघ्न सुमंत ॥ भेटावया उठे रघुनाथ ॥ शत्रुघ्न चरणीं मिठीं घालीत ॥ नेत्रीं उदक स्रवतसे ॥६९॥
रावणारि सद्द होऊन ॥ शत्रुघ्नासी देत आलिंगन ॥ तो सुमंते धरिले चरण ॥ चिषकंठवंद्याचें ते काळी ॥१७०॥
बंधूचे परी आदरे ॥ तोही आलिंगिला रघुवीरें ॥ परी प्रीती सौमित्रे ॥ सुमंत शत्रुघ्न आलिंगिले ॥७१॥
यावरी सकळ जुत्पती ॥ सुग्रीव बिभीषण नृपती ॥ सुमंत शत्रुघ्ना परम प्रीतीं ॥ भेटते जाहले तेधवां ॥७२॥
अवश्य सौभाग्यसरिता ॥ दोघांहीं वंदिली जनक दुहिता ॥ यावरी सुमंत म्हणे रघुनाथा ॥ सदगुरु वसिष्ठ समीप आले ॥७३॥
ऐसें बोलतां सुमंत ॥ सामोरा धांवे रघुनाथ ॥ तों वहानाखाली ब्रह्मसुत ॥ राम देखोनि उतरला ॥७४॥
नेत्रीं देखोनि सद्गुरुनाथ ॥ सद्द झाला जनजजामात ॥ ॥ दंडन्यायें नमस्कार घालित ॥ धांवूनि वसिष्ठ उचली प्रेमें ॥७५॥
म्हणे जगद्वंद्या रघुनाथा ॥ तुझें दर्शन दुर्लभ समस्तां ॥ भूभार हरावया तत्वतां ॥ अवतरलासी सूर्यवंशी ॥७६॥
संसारभयश्रममोचना ॥ रावणांतका चिन्मयलोचना ॥ पुराणपुरुषा जगमोहना ॥ धन्य लीला दाविली ॥७७॥
मग बोले जगदात्मा ॥ सर्व तुमचे कृपेचा महिमा ॥ गुरुभक्तासी शिव ब्रह्मा ॥ सनकादिक वंदिती ॥७८॥
राग काळ भय मृत्य ॥ त्यांपासूनि रक्षी सद्गुरुनाथ ॥ देव केले बंधमुक्त ॥ हा प्रताप गुरुकृपेचा ॥७९॥
मग वसिष्ठ मुनीचे चरण ॥ वंदी प्रेमें सुमित्रानंदन ॥ त्यासी गुरुनें हृदयीं धरून ॥ म्हणे धन्य कीर्ति तुझी ॥१८०॥
त्यावरी वसिष्ठाचे चरण ॥ जानकी वंदी प्रमेंकरून ॥ गुरु म्हणे अनंत कल्याण । सौभाग्यवर्धन तुझें हो कां ॥८१॥
जनकात्मजे तूं पूर्ण सती ॥ वाढविली राघवाची कीर्ति ॥ तूं प्रणवरूपिणी चिच्छिक्ति ॥ ब्रह्मांड रचिती स्वइच्छे ॥८२॥
असो सुग्रीव बिभीषणादि वीर ॥ करिती सद्गुरुसी नमस्कार । तों माता आली सत्वर ॥ सुखासनीं बैसोनियां ॥८३॥
वहनापुढें वेत्रधार ॥ चालती सहस्रांचे सहस्र ॥ वहन आच्छादिलें समग्र ॥ हेमांबरेंकरूनियां ॥८४॥
सुमंत म्हणे रघुनाथा ॥ स्वामी जवळी आली माता ॥ तों धीर न धरवे सीताकांता ॥ सामोरा जात त्वरेनें ॥८५॥
वहन ठेलें भूमंडळी ॥ तों राघव धांवूनि आला जवळी ॥ जैसे तान्हे बाळ उडी घाली ॥ धेनु जवळी देखतां ॥८६॥
मातेचे चरणीं मस्तक ॥ ठेवी त्रिभुवननायक ॥ मायेनें उचलोन तात्कालिक ॥ हृदयीं धरिला ते काळीं ॥८७॥
नेत्रीं अश्रुधारा वाहात ॥ तेणें अभिषेकिला रघुनाथ ॥ स्नेहभरें माता स्फुंदत ॥ सद्द कंठ जाहला ॥८८॥
म्हणे चतुर्दश वर्षेपर्यंत ॥ बाळें माझीं गेलीं वनांत । सुकुमार चरणीं चालत ॥ शीतोष्ण सोशित पैं ॥८९॥
श्रीराम माझा राजहंस ॥ सोडोनि अयोध्यामानस ॥ पाठविला कंटकवनास ॥ सांवळा डोळस सुकुमार ॥१९०॥
माझा रामचंद्र निर्मळ ॥ वियोगराहु मध्यें सबळ ॥ चतुर्दश वर्षे शुद्ध मंडळ ॥ वदन आजि देखिला ॥९१॥
चतुर्दश वर्षें क्रमिली रजनी ॥ आजि राम उगवला वासरमणी ॥ अयोध्याजनवदनकमळिणी ॥ टवटविल्या एकदांचि ॥९२॥
नवमेघरंग रघुवीर ॥ वियोगसमीरें नेला दूर ॥ देहक्षेत्र शोषिलें समग्र ॥ आजिवरी आमुचें ॥९३॥
असो यावरी रघुनंदन ॥ करी मातेचें समाधान ॥ म्हणे भाग्य आमुचें परिपूर्ण ॥ देखिले चरण डोळां तुझें ॥९४॥
तों येऊनि लक्ष्मण ॥ वंदी कौसल्येचे चरण ॥ कौसल्येनें हृदयी धरून ॥ बोले वचन सद्द ॥९५॥
दोघे माझे चिंतामणी ॥ गोफणिले होते दूर वनीं ॥ पूर्वभाग्येंकरूनी ॥ पुढती नयनीं देखिले ॥९६॥
सुमित्रेचे चरण सप्रेमें ॥ वंदिले तेव्हां आत्मारामें ॥ हृदयीं आलिंगिला सप्रेमें ॥ सुमित्रेनें तेधवां ॥९७॥
म्हणे चतुर्दश वर्षेपर्यंत ॥ अयोध्या जाहली होती प्रेतवत ॥ आजि निजप्राण रघुनाथ ॥ आंत संचरला ॥९८॥
असो सुमित्रेसी वंदून ॥ रामें कैकयीस केले नमन ॥ कौसल्येऐसें आलिंगन ॥ प्रीतीनें तेणें दिधलें ॥९९॥
कैकयी म्हणे रघुनाथा ॥ कल्याणरूपें नादें आतां ॥ अपयश आलें माझे माथां ॥ तें आजि सर्व निरसलें ॥२००॥
शुष्क कासारींचें मीन ॥ तळमळत होते अयोध्याजन ॥ तो आजि राम जगज्जीवन ॥ येऊनि भरलें एकसरें ॥१॥
इकडे सुमित्रेचे चरण ॥ साष्टांग नमी लक्ष्मण ॥ पुत्रास प्रेमें उचलून ॥ हृदयी धरी तेधवां ॥२॥
म्हणे चवदा वर्षें निराहार ॥ वनी श्रमलासी तूं थोर ॥ सौमित्र देत प्रत्युत्तर ॥ रघुवीरकृपेनें सुखी होतो ॥३॥
मग कैकयीस नमस्कार ॥ करीत भूधरावतार ॥ आलिंगोनियां सौमित्र ॥ म्हणे बारे विजयी होईं ॥४॥
यावरी कौसल्येचे चरणीं ॥ लागे येऊन मंगलभगिनी ॥ हृदयीं दृढ आलिंगोनी ॥ रामजननी बोलत ॥५॥
चतुर्दश वर्षेंपर्यंत ॥ माये श्रमलीस बहुत ॥ स्नेहे मुख कुरवाळीत ॥ जानकीचे तेधवां ॥६॥
नवरत्नमुद्रिका परम प्रीतीं ॥ घाली जानकीचें हातीं ॥ तों सीतेनें सुमित्रा सती ॥ परम स्नेहें नभियेली ॥७॥
सुमित्रा म्हणे वो साजणी ॥ परम श्रमलीस काननीं ॥ आपुले कंठींची माळ काढूनी ॥ गळां घातली जानकीच्या ॥८॥
स्नेहेंकरूनि धरिली हृदयीं ॥ मग सीतेनें वंदिली कैकयी ॥ क्षेम जो दिधलें नाहीं ॥ तों वचन काय बोलत ॥९॥
वय तुझें लहान साचार ॥ परी कीर्ति केली बहुत थोर ॥ रावणाची संपदा समग्र ॥ भोगूनियां आलीसी ॥२१०॥
श्रोत्रियाचें पात्र पूर्ण ॥ न कळतां घेऊनि गेलें श्वान ॥ तें श्वान मारिलें क्रोधेंकरून ॥ तरी पात्र ते पवित्र नोहेचि ॥११॥
तैसा राम रावण मारून ॥ तुज आणिलें सोडवून ॥ कोणे एके प्रकारेंकरून ॥ कीर्ति त्रिभुवनीं प्रकटलीं ॥१२॥
राम कष्टला वनवासीं ॥ परी तूं सुखें होतीस लंकेसी ॥ तेथींचा सोहळा मानसीं ॥ आठवत असेल तुझिया ॥१३॥
ऐसें कैकयी बोलतां ॥ उगीच परतून गेली सीता ॥ अपवित्रासी उत्तर देतां ॥ येत हीनता श्रेष्ठासी ॥१४॥
म्हणोनियां जनकबाळी ॥ जाऊनियां बैसली कौसल्येजवळी ॥ शांतीपासीं जैसी शोभली ॥ क्षमा निरंतर राहावया ॥१५॥
कीं आवडी तेथें भक्ती ॥ राहे जैसी परम प्रीतीं ॥ कीं धारणा तेथें वृत्ती ॥ न सोडीच सर्वथा ॥१६॥
तैसी कौसल्येपासीं सीता ॥ शोभली ती जगन्माता ॥ भाविक दुर्जना त्यागूनि तत्वतां ॥ संतसंगें जेवीं वसे ॥१७॥
रामविजयग्रंथ सुरस ॥ उत्तरकांड हाचि कळस ॥ त्यावरी अयोध्याप्रवेश ॥ सावकाश परिसिजे ॥१८॥
मंगलस्नान करून ॥ रघुवीर करील भोजन ॥ मग सुमूर्तेेंसी संपूर्ण ॥ अयोध्येत प्रवेशती ॥१९॥
श्रीधरवरदा राघवेशा ॥ ब्रह्मानंदा पुराणपुरुषा ॥ अभंगपद निजदासा ॥ कृपा करून देईं तूं ॥२२०॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ पंचत्रिंशत्तमोध्याय गोड हा ॥२२१॥
॥ अध्याय ३५ ॥ ओंव्या ॥२२१॥
॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Navratri 2024 : स्तुती सुमने आई मी,उधळली

Shardiya Navratri 2024 शारदीय नवरात्री साजरी करण्यामागील कारण माहित आहे का? श्रीरामाने देवीची पूजा का केली?

महिला पिंड दान करू शकतात का?

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

आरती शनिवारची

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments