Publish Date: Thu, 09 Feb 2017 (14:38 IST)
Updated Date: Thu, 09 Feb 2017 (14:41 IST)
नोटाबंदीच्या निर्णयानंतर सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्या पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची खंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी लोकसभेत बोलताना व्यक्त केली. बुधवारी संसदेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चासत्रात खासदार महाडिक यांनी सडेतोड मुद्दे व चैफेर भाषण करुन सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी कसलाही दिलासा मिळाला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना, शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी, सूक्ष्म सिंचनासाठी १०० टक्के अनुदान, पीक विम्याची व्याप्ती वाढवणे अशा विविध मागण्या महाडिक यांनी संसदेत केल्या. तसेच शेतीमालाला किमान आधारभूत किंमत निर्धारित करावी, साखर कारखानदारीच्या कर्जाची पुनर्रचना करावी, लघू आणि मध्यम उद्योगांना वीज दरात सवलत द्यावी, सहकार क्षेत्राचं सक्षमीकरण व्हावं, यासाठी आवश्यक तरतुदी व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.