Publish Date: Thu, 09 May 2019 (16:36 IST)
Updated Date: Thu, 09 May 2019 (16:39 IST)
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर कथित दुष्कर्म केल्याप्रकरणी अभिनेता करण ओबेरॉय याला अटक करण्यात आली. करणवर केले गेलेले सगळे आरोप खोटे असल्याचे सांगत त्याच्या समर्थानार्थ अभिनेत्री पूजा बेदीसह काही कलाकारांनी पुढाकार घेत पत्रकार परिषद घेतली. करण ओबेरॉय याची बहीण फॅशन डिझायनर गुरबाणी ओबेरॉय, अभिनेत्री आणि बेस्ट फ्रेंड पूजा बेदी, बँड ऑफ बॉयज'चे प्रतिनिधी सुधांशू पांडेय, शेरिन वर्गीश, चैतन्य भोसले आणि सिद्धार्थ हल्दीपूर हे सगळे पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते.
करणला खोडसाळपणे या सगळ्या प्रकरणात गोवले जात असल्याचे सांगत बेदी म्हणाली की, करण अतिशय सज्जन मनुष्य आहे. तो असे काही करणार नाही याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे. या सगळ्या प्रकरणामुळे करण आणि त्याच्या कुटुंबीयांना जो मानसिक त्रास होत आहे, त्याची भरपाई होणे कधीच शक्य नाही. आपल्या देशात महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांचा अनेक महिला गैरवापर करतात. आपण अशा महिलांचे खरे रूप ओळखले पाहिजे. आज करणकडे सगळेच दुष्कर्मी म्हणून पाहत आहेत. त्याच्याविषयी मीडियामध्ये चर्चांना उधाण आले आहे. पण, उद्या तो निर्दोष आहे हे सिद्ध झाल्यावर मात्र केवळ एक छोटी बातमी प्रसिद्ध केली जाईल आणि या प्रकरणात झालेली त्याची बदनामी सगळे विसरतील. तो निर्दोष सुटल्यावरही त्याच्यावर बसलेला हा शिक्का मात्र पुसला जाणार नाही. आज 'मी टू'च्या नावाखाली देशातील अनेक पुरुषांची नावे खोट्या प्रकरणात गोवण्यात येतात. करणसारख्या अशा सगळ्या पुरुषांसाठी आता 'मेन टू' मूव्हमेंट सुरू करायची गरज आहे, असेही पूजा म्हणाली.