Publish Date: Thu, 19 Apr 2018 (10:59 IST)
Updated Date: Thu, 19 Apr 2018 (11:00 IST)
देशात महिलांविरोधातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक बाब असल्याचे मोदींनी मान्य केले पण त्याचवेळी कोणी या घटनांचे राजकारण करु नये असे त्यांनी म्हटले आहे. लंडनमधल्या ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये ‘भारत की बात, सबके साथ’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कोणाच्या सरकारमध्ये बलात्काराच्या किती घटना घडल्या त्याची तुलना करणे चुकीचे आहे. हा एक संवेदनशील आणि गंभीर विषय आहे असे मोदी म्हणाले. महिलांविरोधातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय आहे. बलात्कार हा बलात्कार असतो. त्याचे कोणी राजकारण करु नये असे मोदी यांनी सांगितले.
जो पाप करतोय तो कोणाचा तरी मुलगाच असतो. त्यामुळेच लाल किल्ल्यावरुन मी हा विषय नव्या पद्धतीने मांडला होता. मुलगी उशिरा घरी आली तर उशीर का झाला ? कुठे गेली होतीस ? कोणाला भेटलीस ? असे प्रश्न विचारतात. पण हेच प्रश्न मुलगा जेव्हा घरी उशीरा येतो तेव्हा त्याला सुद्धा विचारा असे मोदी म्हणाले.