Publish Date: Sat, 21 Jul 2018 (09:14 IST)
Updated Date: Sat, 21 Jul 2018 (09:16 IST)
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारली. या मिठीमुळे मोदींसहीत सत्ताधारी भाजपचे खासदारही आश्चर्यचकित झाले. मात्र त्यानंतर इंटरनेटपासून अनेक चर्चासत्रांमध्ये राहुल गांधीनी मारलेली ही मिठी योग्य की अयोग्य यावर अनेकांनी आपली मते नोंदवली. काहींना ही कृती चूक वाटली तर काहींनी त्यांचे समर्थन केले. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही राहुल गांधी यांनी पदाचा मान बाळगायला हवा होता असे सांगत राहुल यांची वर्तवणूक चुकल्याचे मत नोंदवले. या मिठीच्या समर्थनार्थ आणि विरोधात बोलणाऱ्या ट्विपल्सने #RahulHugsModi हा हॅशटॅग वापरत आपली मते ट्विटवर नोंदवली आहेत. विशेष म्हणजे हा हॅशटॅग भारतात दुसऱ्या क्रमांकावर ट्रेण्ड करत आहे. हा हॅशटॅग वापरून तब्बल ४० हजार ५००हून अधिक ट्विट पडले आहेत. याच मिठीवरून सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधीच्या मिठीचा स्वीकार करायला मोदींना काय हरकत होते असा प्रश्न उपस्थित करताना राज यांनी ट्विटवर ‘जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांना, उद्योगपतींना मिठ्या मारणाऱ्या नरेंद्र मोदींना, राहुल गांधींच्या मिठीचा स्वीकार उमदेपणाने करायला काय हरकत होती?’हा प्रश्न ट्विट केला आहे. फेसबुकवरही त्यांनी हेच पोस्ट केले आहे.