Publish Date: Tue, 27 Feb 2024 (19:53 IST)
Updated Date: Tue, 27 Feb 2024 (19:55 IST)
जरांगे पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष मागील दोन दिवसांपासून तीव्र झाला होता. फडणवीस यांच्यावर आरोप करताना मनोज जरांगे यांनी अपशब्दांचा वापर केला होता. यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गदारोळ झाला. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर आमदारांनीही जरांगे यांच्यावर प्रतिहल्ला केला. त्यानंतर अखेर जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे घेतले आहेत.
"देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तुम्ही शिवराळ भाषेचा वापर केला. हा मुद्दा त्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. याबाबत तुमची काय भूमिका आहे?" असा प्रश्न मनोज जरांगे पाटलांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, "हो, मी पण बघितलं की त्यांनी विधानसभेच्या पटलावर छत्रपती शिवरायांचं नाव घेत हा मुद्दा मांडला आणि कोणाच्या आई-बहिणीवरून बोलणं योग्य आहे का, असं म्हटलं. मात्र मी देखील माय-माऊलींचा सन्मान करतो. अनावधानाने ते शब्द माझ्या तोंडून गेले असतील, कारण १७-१८ दिवस पोटात अन्न नव्हतं. ते शब्द मी मागे घेतो आणि दिलगिरीही व्यक्त करतो," असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor