Publish Date: Mon, 20 Apr 2020 (13:20 IST)
Updated Date: Mon, 20 Apr 2020 (13:22 IST)
पालघर प्रकरणावर संताप व्यक्त करत अभिनेता सुमीत राघवनने ‘संतांची, वीरांची भूमी.. असं आपण यापुढे बोलायचं टाळूया. नराधमांची भूमी जास्त योग्य आहे’, असं ट्विट केले आहे.
उल्लेखनीय आहे की गुरूवारी रात्री पालघरमधील एका गावात लोकांनी दोन साधूंसह तीन जणांना ठार मारल्याची घटना घडली होती. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे.
यावर संताप व्यक्त करत सुमीतने ट्विट करत लिहिलं, ‘मी सुन्न झालोय. भीषण, भीतीदायक, लाजिरवाणं आहे जे घडलं. संतांची वीरांची भूमी असं टाळूया आपण यापुढे बोलायचं. नराधमांची भूमी जास्त योग्य आहे. ही घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेवर लागलेला काळा डाग आहे.’ सुमीतने या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व पालघर पोलिसांना टॅग केलं आहे.
दुसरं ट्विट करत त्याने लिहिलं, ‘जमाव इतका रक्तपिपासू कसा असू शकतो? हा मूर्ख प्रकार कोणीच कसा थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. खरचं ही वेळ आहे स्वत:ला प्रश्न विचारण्याची की हे योग्य आहे का?
पालघर प्रकरणाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतल्याचं म्हटलं आहे.