Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
जर स्पर्धा रद्द झाल्या तर भारतीय क्रिकेटपटूंचे पगार कापण्यात येतील, असे वक्तव्य भारतीय क्रिकेटर्स संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी केले होते. या वक्तव्यचा खरपूस समाचार भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी घेतला आहे.
गावसकर यांनी आपल्या स्तंभलेखातून मल्होत्रा यांच्या वक्तव्यावर ताशेरे ओढले आहेत. एका स्तंभलेखात गावसकर म्हणाले की, जर खेळाडू खेळलाच नाही तर त्याचे मानधन मिळत नाही. जगभरात सर्वच खेळांच्या स्पर्धांमध्ये असेच पाहायला मिळते. पण भारतीय क्रिकेटर्स संघटनेच्या अध्यक्षांनी खेळाडूंचा पगार कापण्याचे केलेले वक्तव्य हे मला मनोरंजक वाटत आहे.
ते आपल्या स्तंभात पुढे म्हणाले आहेत की, मल्होत्रा यांनी केलेले वक्तव्य खेळाडूंच्या बाजूचे वाटत नाही. पण सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारे खेळाडू या संघटनेचा भाग नाहीत. त्यामुळे त्यांनी कोणाच्यावतीने हे वक्तव्य केले आहे.
कोरोना व्हायरसचा धक्का क्रीडा जगताला बसला आहे. भारतातील सर्वात श्रीमंत समजली जाणारी आयपीएल सध्या पुढे ढकलली गेली आहे. पणजर आयपीएल रद्द करण्यात आली तर खेळाडूंना ठरवलेले मानधन मिळणार नाही, असे समजते आहे.