Publish Date: Thu, 28 Apr 2022 (08:37 IST)
Updated Date: Thu, 28 Apr 2022 (08:41 IST)
हिंदवी स्वराजची कीर्तीध्वजा अवघ्या भारतभर पसरविणार्या आणि युगप्रवर्तक छ. शिवरायांचा वारसा खर्या अर्थाने चालविणार्या थोरल्या बाजीरावांचा आज स्मृतिदिन. बाळाजी विश्वनाथ भटांचा हा थोरला पुत्र. आपल्या सर्व सरदारांमध्ये मराठा साम्राज्याची आकांक्षा निर्माण करून ती सिद्धीस नेणारा आणि चहूदिशांना मराठी सत्तेच्या नौबती वाजविणार्या या प्रतापी बाजीरावाने स्वकर्तृत्वावर दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला.
दाभाडे, निजाम व दिल्लीकरांशी झालेला लढा, पालखेडची लढाई, डभई व भोपाळची रणयुद्धे, बुंदेलखंड व औरंगाबादचा रणसंग्राम ही थोरल्या बाजीरावाच्या पराक्रमाची ठळक स्थाने. चिमाजी आप्पांसारखा पराक्रमी व मुत्सद्दी भाऊ, होळकर, शिंदे, पवारांसारखे पराक्रमी सरदार यांच्या बळावर बाजीरावांनी मराठा साम्राज्याचा लौकिक वाढविला. मर्द त्या मराठी फौजा। रणकीर्ती जांच गाव। तळहाती शिर घेवूनिया, चालुनी तटावर जाव्या। जणु घोंघावत मधमाशा, झणि मोहळास बिलगाव।अशी वृत्ती मराठी फौजांत निर्माण करणारा हा प्रतापी बाजीराव. 28 एप्रिल 1740 रोजी त्यांचे निधन झाले.