Publish Date: Tue, 02 Feb 2021 (16:22 IST)
Updated Date: Tue, 02 Feb 2021 (16:23 IST)
कोरोनानंतर मुंबईची उपनगरी रेल्वे सेवा सुरु झाली आहेत. मात्र सर्वसामान्यांना प्रवास करण्यासाठी वेळेचं बंधन असून त्याचं उल्लंघन केल्यास दंड ठोठावला जात आहे. सर्वसामान्यांना सकाळच्या वेळी पहिल्या लोकलपासून ते पहाटे सात वाजेपर्यंतच प्रवास करण्याची मुभा असल्याने नोकरदार वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे लोकलच्या वेळा बदलण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लवकरच लोकल प्रवासाच्या वेळेत दिलासा मिळण्याची शक्यता असून तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.
“लोकांची सोय हीच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणून पाहिली पाहिजे. जर काही सुधारणा लोकलच्या वेळेत करण्याची गरज असेल तर तशा सूचना करण्यासंदर्भात कळवलं जाईल. लोकांचं हित हेच अंतिम महत्वाचं असतं. त्यामुळे त्याचदृष्टीने काम केलं जाईल. यामुळे काही बदल अपेक्षित असेल तर ते करण्यासाठीचे प्रयत्न असतील,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.