Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालमधील विजयानंतर ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. ठाकरेंनी ममता बॅनर्जी यांनी या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाचंही कौतुक केलं आहे.
सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टमधून राज ठाकरेंनी म्हटलं की संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलं असं राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
त्यांनी म्हटलं की कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा याबाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल दोन्ही राज्यांमध्ये समानता आहेत. त्यामुळे राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता याचं महत्त्व तुम्ही समजू शकता असंही राज ठाकरे म्हणाले. राज्यांच्या स्वायत्ततेचा तुम्ही आग्रही आवाज बनाल, अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी यावेळी तामिळनाडूत मिळवलेल्या विजयाबद्दल स्टॅलिन आणि डीएमके पक्षाचंही अभिनंदन केलं.