Publish Date: Mon, 16 Jul 2018 (16:33 IST)
Updated Date: Mon, 16 Jul 2018 (16:35 IST)
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील मणिराम आखाड्याजवळ वरातीतील नाराज वऱ्हाडी मंडळींनी नवरी मुलीकडील पाहुण्यांना मारहाण केली. कारण लग्नात रसगुल्ले मिळाले नसल्यामुळे वर आणि वधु पक्षातील वऱ्हाड मंडळीत तुफान राडा झाला आहे. शेखपुरा जिल्ह्यातील मडपसौना या गावातून हे वऱ्हाड आले होते.
लग्नानंतर वऱ्हाडी मंडळींना जेवण वाढण्यात येत होते. त्यावेळी वर पक्षाच्या काही तरुणांनी जेवणात रसगुल्ला देण्याची मागणी केली. अनेकवेळा रसगुल्ला देऊनही मुलाकडील मंडळी ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे वधु पक्षातील लोकांनी रसगुल्ला देण्यास नकार दिला. त्यावरुन दोन्ही पक्षात भांडण सुरु झाले. सुदैवाने तो वाद तिथेच संपुष्टात आला. मात्र, काही वेळातच वर पक्षातील जवळपास 20 ते 25 युवक काठ्या, लोखंडी रॉड, आणि लाकडी बांबू घेऊन लग्नमंडपात आले. त्यानंतर लग्नमंडपात दिसेल त्याला चोप देण्यास या तरुणांनी सुरुवात केली. त्यामुळे काही क्षणातच लग्नाच्या आनंदावर विरजण पडल्याचे पाहायाला मिळाले. या गावगुंडांनी लग्न समारंभातील महिलांनाही मारहाण केली. या घटनेत नवरी मुलीचे आई-वडिल, भाऊ, भावोजी यांसह जवळपास 10 ते 12 जण जखमी झाले आहेत.