Publish Date: Mon, 27 Feb 2017 (10:30 IST)
Updated Date: Mon, 27 Feb 2017 (10:32 IST)
मुंबईचा कारभार सुरळीत चालावा एवढीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. भाजपा आणि शिवसेनेत दोन जागांचाच फरक आहे. शिवसेना जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करेल, मात्र वेळ आलीच तर भाजपा वगळता इतर पक्षांना पाठिंबा देण्याबाबत स्थानिक नेते विचार करतील, असे सांगून खा. शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण ९ जागा जिंकल्या आहेत. आपण भाजपाला पाठिंबा देणार नाही हे पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या असून, एका अपक्षासह विजयी झालेल्या तीन बंडखोर उमेदवारांनी पाठिंबा दिला आहे. परिणामी, सेनेचे संख्याबळ ८८ झाले आहे. तर भाजपाकडे ८२ जागा आहेत. संख्याबळानुसार शिवसेना किंवा भाजपा दोन्ही पक्ष स्वबळावर महापौर निवडून आणू शकत नाहीत. एकतर दोघांना एकत्र यावे लागेल, अथवा काँग्रेसचा पाठिंबा मिळवावा लागेल. मात्र, शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तरच पाठिंबा देऊ, अशी अट काँग्रेसने घातली आहे.