Article Personality Development Marathi %e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a4%be %e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%b8%e0%a4%b8%e0%a5%80 %e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8 109051300036_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हमालाचा मुलगा झाला युपीएससी पास

- मनोहर पाटील

हमालाचा मुलगा झाला युपीएससी पास
PR
घरची परिस्थिती हलाखीची म्हणून प्राथमिक शिक्षण घेता घेताच त्याने हॉटेलमध्ये काम केले. मग आयटीआय होऊन फीटर झाला. मधल्या काळात पेपर वाटप असो वा एसटीडी दुकानात काम, कुठलीही लाज आणि कष्टाची न बाळगता ही कामेही केली. मग एक मोठं स्वप्न पाहिलं, युपीएससी करण्याचं. हेच कष्ट पुढे नेत त्याने अखेर हेही स्वप्न पूर्ण केलं नि या कठिण परिक्षेत तो देशात 263 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. नाशिकच्या संजय आखाडेची ही प्रेरणादायी कहाणी....

संगमनेर तालुक्यातील करुल हे संजयच मूळ गाव. दुष्काळी भाग असल्यामुळे रोजगारासाठी संजयचे वडील ज्ञानदेव आखाडे यांनी अनेक वर्षापूर्वी नाशिकचा रस्ता धरला. हनुमानवाडी येथील कष्टकर्‍यांच्या वस्तीत निवासाची सोय झाली आणि ज्ञानदेव यांनी हमाली तर संजयची आई विमलबाई यांनी विड्या वळण्याचे काम करून संसारासाठी धडपड सुरू ठेवली.

संजय लहानपणापासूनच अभ्यासात हुषार होता. पण कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव त्याच्यात खोलवर रूजली होती. कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा म्हणून शाळेला सुटी लागल्यानंतर हॉटेलमध्ये काम करीत असे. हॉटेलमध्ये येणारे सुटाबुटातले ग्राहक पाहून आपण असे कधी तरी बनू अशी स्वप्ने त्याने नेहमीच पाहिली. पंचवटी माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी लागेल आणि रोजगार मिळेल या आशेने संजयने दहावीनंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत फिटरच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. या काळात डबा नेण्याचीही परिस्थिती नसल्याने रोज सायंकाळी पाच वाजता जेवण करायचो. म्हणजे दोन्ही वेळचे पोट भरल्याचे समाधान तरी लाभायचे, इति संजय.

फिटरचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर सातपूर, अंबड, माळेगाव (सिन्नर) येथील विविध कंपन्यांत कामही केले. पण परिस्थिती काही बदलली नव्हती. दहा बाय दहाच्या घरात राहताना पाय लांब केले तरी ते भिंतीला लागायचे. आर्थिक बाबींसाठी नेहमी ओढाताण ठरलेली असायची. माळेगाव येथे केएसबीमध्ये काम करताना एके दिवशी वृत्तपत्रात युपीएससीची जाहिरात त्याला दिसली आणि त्या जाहिरातीने त्याच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. मग त्याने कितीही कष्ट पडले तरी आयएसएस व्हायचेच असा निर्धार केला. तसा विचार भावांना बोलूनही दाखवला. पण आयएसएस म्हणजे नेमके काय याची त्यांनाही पुर्ण कल्पना नसल्याने त्यांनीही संजय जे करेल ते उत्तमच असेल असे समजून होकार दिला.

त्याच काळात नाशिक येथे पुणे येथील चाणक्य मंडलचे अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यानही संजयने कामाला दांडी मारून ऐकले आणि तेथून या निर्धाराला बळकटी मिळाली. पुढील अभ्यासासाठी संजयने पुणे गाठले आणि तेथे चाणक्य मंडलमध्ये अभ्यासास सुरुवात केली. 2005 मध्ये संजयने पुर्वपरिक्षा दिली. त्यानंतर 2006 आणि 2007 मध्येही पुन्हा प्रयत्न केला. पण अपयशाने पाठ सोडली नाही. मग नको ती युपीएससी अशी त्याची मनोवस्था झाली. पण ज्येष्ठ क्रीडामार्गदर्शक भीष्मराज बाम आणि अन्य मित्रांच्या मार्गदर्शनामुळे संजयने या नैराश्यावर मात केली. याच काळात सीमा सुरक्षा दलाची परीक्षाही संजय पास झाला. मात्र, तिकडे न जाता याच ध्येयावर वाटचाल करायची म्हणजे एकदिवस यश नक्की मिळेल या आशेने तो चालत राहिला.

अठरा-अठरा तास अभ्यास त्याने कधी चुकवला नाही. पण आर्थिक ओढाताणही संपली नाही. उलट 2008 मध्ये लग्न झाल्यामुळे संसाराची जबाबदारी वाढली. मात्र, वाढत्या जबाबदारीने न डगमगता संजयने नाशिकमध्ये राहूनच मुलाखतीचा अभ्यास सुरू केला आणि अखेर मे 2009 मध्ये संजयचे स्वप्न पूर्ण झाले.

निकाल लागल्यानंतर संजयने सर्वांत आधी आईला ही बातमी सांगितली. पण संजयने नेमका काय पराक्रम केला, ते त्या अडाणी माउलीला कळले नाही पण तिच्या डोळ्यात मात्र त्याच्या यशाचा आनंद लख्ख दिसत होता. तेच भाव आणि आनंदाश्रू आपल्या पुढील कर्तृत्वासाठी लाखमोलाचे आहेत असे संजयने सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi