Publish Date: Saturday, 17 October 2020 (17:00 IST)
Updated Date: Saturday, 17 October 2020 (16:27 IST)
पुण्यात कोरोना असेल या भीतीने एका कामगाराचा मृतदेह पाच ते सहा तास घरातच पडून होता. अखेर सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ननावरे यांनी पुढाकार घेत मृतदेह बाहेर काढला आणि रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करत विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. प्रसाद कुमार गुप्ता (४२) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
तो पिंपरीतील महात्मा फुले नगर येथे कुटुंबासह राहायचा. बिहारमधून तो कामानिमित्त पिंपरीत स्थायिक झाला होता. लॉकडाउन झाल्याने गुप्ता कुटुंबाला घेऊन त्याच्या मूळ गावी बिहार येथे गेला. त्यानंतर शहरात तो एकटाच परतला. दरम्यान, सकाळी त्याचा राहत्या घरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र शेजारच्या लोकांनी घराबाहेर का येत नाही हे पाहिले असता त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. कुटुंबातील सदस्यांची परिस्थिती नाजूक असल्याने मृतदेह बिहारला घेऊन जाण्यास किंवा शहरात येण्यास ते असमर्थ होते. त्यामुळे नातेवाईकांची परवानगी घेऊन व्हाट्सऍप कॉलद्वारे शेवटचे अंतिम दर्शन घडवून ननावरे यांनी मयत प्रसाद कुमार गुप्ता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.