Publish Date: Sun, 17 Apr 2022 (10:11 IST)
Updated Date: Sun, 17 Apr 2022 (10:13 IST)
जवळपास साडे पाच महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप पूर्णपणे संपण्याची चिन्ह दिसत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर एसटी कर्मचारी कमावर रूजू होण्यास सुरुवात झाल्याचं दिसतंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी मुंबईत हल्ला झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच एसटी संपकऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत 43 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत.
राज्यभरात 3 नोव्हेंबर 2021 पासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. दरम्यानच्या काळात शेकडो कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता परंतु मोठ्या संख्यने कर्मचारी संपावर ठाम होते.
एसटी महामंडळाचे विलीनीकरण ही या संपाची प्रमुख मागणी होती. आता एसटीच्या 16 हजार 697 दैनंदिन फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एसटी वाहतूक पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.