Publish Date: Wed, 17 Aug 2022 (15:09 IST)
Updated Date: Wed, 17 Aug 2022 (15:11 IST)
द्रौपदी मुर्मू यांना झारखंडच्या लोकप्रिय राज्यपाल म्हणून ओळखले जाते. मात्र आज अनेक राज्यपालांच्या भुमिकेबद्दल वाद संशय आणि वाद निर्माण होताना आपण पाहतो, अशा शब्दांत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या सुरूवातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यांच्या या प्रस्तावाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पाठींबा दिला.
“राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १८ मे २०१५ रोजी झारखंडच्या पहिल्या महिला आणि आदिवासी राज्यपाल म्हणून शपथ घेतली. द्रौपदी मुर्मू या 6 वर्षे 1 महिना 18 दिवसांपासाठी राज्यपाल पदी कार्यरत होत्या. त्या झारंखंडच्या अशा पहिल्या राज्यपाल होत्या की, ज्यांना त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही पदावरून हटवण्यात आले नव्हते. द्रौपदी मुर्मू यांना झारखंडच्या लोकप्रिय राज्यपाल म्हणून ओळखले जाते. मात्र आज अनेक राज्यपालांच्या भुमिकेबद्दल वाद संशय आणि वाद निर्माण होताना आपण पाहतो. मात्र द्रौपदी मुर्मू या राज्याच्या राज्यापाल म्हणून राजकीय वादातून दुर राहिलेले आपण पाहिले. त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे कौतुक केले जात होते”, असे अजित पवार यांनी म्हटले.