भिवंडी शहरातील फेणे गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीने तिच्या तीन मुलींसह गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नवरा रात्रीच्या शिफ्टमध्ये कामावर गेला होता आल्यावर त्याला पत्नी आणि तीन मुलींचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत पाहून धक्काच बसला.
फेणे गावाच्या एका चाळीत कामगार लालजी बनवारीलाल भारती हे पत्नी आणि तीन मुलींसह राहायचे. ते रात्रीपाळीला कामावर गेले. सकाळी 9 वाजेच्या सुमारास घरी आल्यावर त्यांनी दार ठोठावले. बराच वेळ झाला कोणीच दार उघडले नाही. तेव्हा त्यांनीं खिडकीतून डोकावून पहिले असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी दार तोडल्यावर त्यांना पत्नी आणि मुलींचे मृतदेह छतावर लोखंडी कोनात लटकलेले आढळले.
घटनेची माहिती मिळाल्यावर बिट मार्शलसह पोलीस घटनास्थळी पोहोचले.पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले.
मृतदेहाजवळ स्वतःच्या जीवन प्रवासाच्या समाप्तीसाठी कोणालाही दोषी ठरवू नये असे सुसाईड नोट मिळाले आहे. महिलेने मुलींसह असे टोकाचे पाऊल का घेतले हा प्रश्न उदभवला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.