महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृहे आणि रोजगार यासारख्या सुविधांसाठी योजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. पुढील 3 वर्षात आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळमध्ये एकूण 335 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार संजय देशमुख, आमदार राजू तोडसाम, आमदार किसनराव वानखेडे, सैताई डहाके, संजय देरकर, श्याम कोडे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी विकास मीना आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 54 हजार कुटुंबांसाठी घरे, नळपाणी, उपचारांसाठी दवाखाने, आदिवासी समुदायासाठी वसतिगृहे अशा अनेक सुविधा लवकरच पूर्ण करण्याची योजना आहे.
आदि कर्मयोगी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 366 गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेद्वारे राज्यातील ३० लाख तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे स्थानिक नेतृत्व विकसित होईल. पावसामुळे जिल्ह्यातील शेती, घरे आणि पशुधनाचे नुकसान झाले आहे. याची भरपाई देखील लवकरात लवकर देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज यवतमाळमध्ये 335 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यामध्ये आदिवासी विकास विभागाची51 कोटी रुपयांची पाच वसतिगृहे आणि इतर कामे समाविष्ट आहेत. यासोबतच बांधकाम विभागाची 67 कोटी रुपयांची कामे, 11सौरऊर्जा प्रकल्प आणि मुख्यमंत्री सौरऊर्जा वाहिनी योजनेअंतर्गत इतर कामे आणि इतर कामांसाठी 158 कोटी रुपये आणि विविध विभागांची 59 कोटी रुपयांची कामे समाविष्ट आहेत.