Publish Date: Thu, 09 Feb 2017 (17:27 IST)
Updated Date: Thu, 09 Feb 2017 (17:29 IST)
राज्यातील १० महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समिती निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तशी अधिसूचना निवडणूक आयोगाने काढलेली आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या दहाही महापालिकांसाठी मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्यादिवशी या महापालिका क्षेत्रांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि गडचिरोली या ११ जिल्हा परिषदांकरिता व त्यांतर्गत येणाऱ्या ११८ पंचायत समित्यांच्या क्षेत्रातही मतदानाच्या दिवशी म्हणजे २१ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.