Publish Date: Mon, 09 Sep 2019 (15:26 IST)
Updated Date: Mon, 09 Sep 2019 (15:31 IST)
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. सांगलीत आयुर्विन पुलाजवळ कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 32 फूट 5 इंचावर गेली आहे. खबरदारी म्हणून सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आणि दत्तनगर या परिसरातील काही नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे. दरम्यान कृष्णा नदीच्या पाणी पातळी 30 फुटांवर गेल्याने शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आणि मगरमच्छ कॉलनी या परिसरात पाणी शिरले आहे.
कोल्हापुरातही 335.57 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 68 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर पंचगंगेची धोका पातळी 43 फूट असून सद्यस्थितीत पाणी पातळी 39 फूट 9 इंचापर्यंत पोहोचली आहे. तसेच राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग अद्याप सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.