मंत्रालयात गुरुवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठा सापळा रचून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंगे यांना लाच घेताना अटक केली आहे.
मुंबईतील काही केमिस्ट व्यावसायिकांचे परवाने विविध कारणांमुळे निलंबित केले होते.
हे निलंबन मागे घेण्यासाठी मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे सुनावणी सुरु होती. हे निलंबन रद्द करण्याच्या बदलात ढेरंगे यांनी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर 35 हजार रुपयांवर तडजोड झाली.
या प्रकरणी ढेरंगे यांनी अटकेनंतर आपण मंत्री झिरवळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून लाच घेतली आहे. असे कबूल केले आहे. एसीबीने मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर हा सापळा रचून सायंकाळी 6 वाजून काही मिनिटांनी कारवाई केली.
या अटकेचा व्हिडीओ प्रदेश काँग्रेसने सोशल मीडियावर प्रसारित केल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकारणांनंतर मंत्रालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
विधानसभा उपाध्यक्ष आणि मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कारकून राजू उर्फ राजेंद्र ढेरंगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.
या प्रकरणावरून महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “महाभ्रष्ट महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात उघडपणे लाचखोरी सुरू आहे.” त्यांनी पुढे संताप व्यक्त केला की, सध्याच्या परिस्थितीत “जनतेची कामे पैशाशिवाय होत नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब आहे.” सरकारवर टीकास्त्र सोडताना त्यांनी मागणी केली की, “मुख्यमंत्र्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावे.”