Publish Date: Fri, 08 Apr 2022 (07:35 IST)
Updated Date: Fri, 08 Apr 2022 (07:36 IST)
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी जिथे मशिदींवर भोंगे लावून अजान सुरू असेल तिथे दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिले. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर सत्ताधारी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. या सगळ्यांची उत्तर देण्यासाठी राज ठाकरे ९ एप्रिल रोजी ठाण्यात उत्तरसभा घेणार होते. पण हीच उत्तरसभा आता १२ एप्रिलला होणार आहे, याबाबतची माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिली.
पत्रकार परिषद घेऊन अभिजीत पानसे सांगितले की, राज ठाकरे यांची उत्तरसभा ९ एप्रिलला जाहीर केली होती. पण ठाणे पोलिसांनी सभेला परवानगी न दिल्यामुळे मनसे नेते बाळा नांदगावकर, राजू पाटील, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि मी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. ठाणे पोलिसांनी रस्तावर सभा घेऊ नका मैदानावर घ्या अशी सूचना दिली होती. पण दुर्दैवाने ठाणे शहरात एकही मैदान नाही. कुठलाही पर्याय नसल्यामुळे गडकरी रंगायतन समोरील रोड तलावपालीवरती सभेचे आयोजन करण्यात आल्याचे निवेदन देण्यात आले. याला परवानगी देण्यासाठी पोलिसांकडून विलंब होत होते. त्यांच्यावर कोणाचा दबाव होता, याची कल्पना नाही.
पुढे पानसे म्हणाले की, दरम्यान चैत्र नवरात्र सुरू आहे, सुट्टीचा दिवस आहे, अष्टमीचा दिवस असल्यामुळे आमच्या अनेक भगिनी दर्शनाला बाहेर पडतात. याच गर्दीचा परिणाम वाहतूक, जनमाणसावर होईल म्हणून पोलिसांना १२ तारखेचा पर्याय दिला होता. याला पोलिसांनी परवानगी दिली आहे. १२ तारखेला त्याच ठिकाणी राज ठाकरेंची उत्तरसभा होणार आहे.