Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
“विरोधी पक्ष आरोप करत असतो. त्यांना कितीही आरोप करु देत…तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार भक्कम आहे. अशा आरोपांमुळे सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही,” असा विश्वास शिवसेना खासदार संजय यांनी व्यक्त केला आहे.संजय राऊत शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
विरोधक उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी करत असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “राजीनामा घेतला पाहिजे हा विरोधी पक्षाचा एक ज्वलंत मंत्र असतो. काही झालं तरी राजीनामा घ्या असं ते म्हणतात. असं जर म्हणायला गेलो तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू. दिल्लीत जे आंदोलन सुरु आहे ते राजीनामा मागण्यासारखंच आहे”. “प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं पाहिजे असं काही घटनेत लिहिलेलं नाही. महाविकास आघाडीला काही धक्का बसणार नाही. आरोप करु देत त्याच्याने काही होत नाही,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं.