Publish Date: Tue, 13 Aug 2019 (16:09 IST)
Updated Date: Tue, 13 Aug 2019 (16:14 IST)
महाराष्ट्र सरकारचे महिला वर्गाबरोबर जिव्हाळ्याचे नाते असून ते अधिक दृढ व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चातर्फे आगामी रक्षाबांधनानिमित्त राबविण्यात येत असलेल्या शक्ती सन्मान महोत्सवाचा एक भाग म्हणून नाशिक महानगर आणि जिल्ह्यातून मिळून संकलित झालेल्या 30 हजार राख्या मुख्यमंत्र्यांकडे मुंबईला रवाना करण्यात आल्याची माहिती प्रभारी संध्या कुलकर्णी, महिला मोर्चाच्या महानगर अध्यक्षा रोहिणी नायडू-वानखेडे आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षा मंदा पारख यांनी दिली.
शक्ती सन्मान महोत्सवाच एक भाग म्हणून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी 1 ते 12 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन महिलांसाठी शासनाने केलेल्या योजना महिलांपर्यंत पोहोचवल्यात आणि त्यांच्याकडून मुख्यमंत्र्याच्या नांवाने राखी घेतल्या. विशेष म्हणजे या राखीच्या माध्यमातून महिलांना मुख्यमंत्र्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी
मिळाली आहे. प्रत्येक बूथस्तरावरून राख्यांचे संकलन व्हावे यासाठी भाजपाच्या महिला मोर्चाची यंत्रणा प्रदेश अध्यक्षा माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत झाली होती. यात बुथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख, मंडल अध्यक्ष, विस्तारक आणि लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची राहिली, असे संध्या कुलकर्णी, सौ.नायडू- वानखेडे आणि पारख यांनी स्पष्ट केले. 15 ऑगस्टपर्यंत राज्यभरातून राख्या संकलित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या 16 ऑगस्टला एकत्रितपणे प्रदान करण्याचा कार्यक्रम मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे.