Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शंतनु ठाकूर: CAA म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा आहे तरी काय?

Webdunia
सोमवार, 29 जानेवारी 2024 (15:17 IST)
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री शंतनु ठाकूर यांनी असा दावा केला आहे की 'आता राम मंदिर झालं आहे, केवळ 7 दिवसांमध्ये CAA म्हणजेच सिटिझन अमेंडमेंटशिप अॅक्ट लागू केला जाईल.'
 
'देशात राम मंदिराचे निर्माण झाले आहे, रामाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. माझी ही गॅरंटी आहे की सात दिवसातच CAA लागू होईल,' असं शंतनु ठाकूर यांनी म्हटलं आहे.
 
रविवारी (28 जानेवारी) पश्चिम बंगालमधील 24 परगणा येथे बोलताना त्यांनी हे विधान केलं. त्यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019ची आता चर्चा सुरू झाली आहे.
 
हा कायदा काय आहे ते आपण समजून घेऊ.
 
या कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.
 
धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला आहे, त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळेल, असं भाजप सरकारनं म्हटलं होतं. मात्र विरोधकांनी या कायद्यावर प्रचंड टीका केली होती.
 
हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे.
 
काय आहे नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019?
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे.
 
सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्षं राहणं आवश्यक असतं. या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन सहा वर्षांवर आली आहे.
 
यासाठी यापूर्वीच्या भारतीय नागरिकत्व कायदा, 1955मध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जेणेकरून अर्ज करणाऱ्या लोकांना कायदेशीररीत्या सोयीचं पडेल.
 
याच कायद्यातील आणखी एका तरतुदीनुसार, भारतात घुसखोरी करणाऱ्या लोकांना नागरिकत्व मिळू शकत नव्हतं तसंच त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची किंवा प्रशासनाने ताब्यात घेण्याचीही तरतूद होती.
 
नागरिकत्व कायदा, 1955 काय आहे?
नागरिकत्व कायदा, 1955 हा भारतीय नागरिकत्वासंबंधीचा एक सर्वसमावेशक कायदा आहे, ज्यात भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अटींची माहिती देण्यात आली आहे.
 
या कायद्यात आतापर्यंत पाच वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे - 1986, 1992, 2003, 2005 आणि 2015.
 
कुठलीही व्यक्ती आपलं भारतीय नागरिकत्व या तीन प्रकारे गमावू शकते -
 
जेव्हा कुणी स्वेच्छेने नागरिकत्वाचा त्याग करण्यास इच्छुक असेल
जेव्हा कुणी दुसऱ्या राष्ट्राचं नागरिकत्व स्वीकारतं
जेव्हा सरकार कुणाचं नागरिकत्व रद्द करतं
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून वाद काय?
हा कायदा मुस्लीमविरोधी असून भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम 14चं उल्लंघन करतं, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कुणालाही धार्मिक निकषांवरून नागरिकत्व कसं मिळू शकतं, असा आक्षेप विरोधक घेत आहेत.
 
ईशान्य भारतात, विशेषतः आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये या कायद्याला कडाडून विरोध केला जात आहे, कारण हे राज्य बांगलादेश सीमेला लागून आहेत. असं सांगितलं जातं की बांगलादेशमधील हिंदू तसंच मुसलमान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून असा आरोप होतोय की भाजप सरकार या कायद्याद्वारे हिंदूंना कायदेशीररीत्या आश्रय देण्याचा मार्ग सुकर करून, आपला व्होट बेस मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
 
त्यातच, राष्ट्रीय नागरिकत्व यादीतून (National Citizenship Register / NCR) बाहेर राहिलेल्या हिंदूंना याद्वारे पुन्हा भारतीय नागरिक म्हणून मान्यता देणं सरकारला सोपं जाईल, असाही एक आरोप होतोय.
 
हे विधेयक राज्यसभेत पुन्हा का मांडलं गेलं?
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात हे विधेयक जेव्हा मांडण्यात आलं होतं, तेव्हा त्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील हिंदू, जैन, पारशी, आणि शीख यासारख्या हिंदूएतर धर्मांच्या लोकांना नागरिकत्व देण्याची तरतूद होती. मात्र या नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2016 मध्ये मुस्लिमांचा कुठेही उल्लेख नव्हता.
 
हे विधेयक लोकसभेत तर संमत झालं पण त्यानंतर राज्यसभेत ते अडकलं. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
 
कुठलंही विधेयक एका सरकारच्या कार्यकाळात संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत होऊन राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं. जर तसं करण्यात सरकारला यश आलं नाही आणि निवडणुका झाल्या तर ते विधेयक निष्प्रभ ठरतं. त्यामुळे ते पुन्हा राज्यसभेत मांडलं गेलं.
 
आणि अखेर ते राज्यसभेत डिसेंबर 2019मध्ये संमत झालं. त्यानंतर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर त्याला कायद्याचं अधिकृत रूप मिळालं.
 
 
Published By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments