Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
शिवसेनेने सामना वृत्तपत्रातून रेणुका चौधरी यांच्या कास्टिंग काऊच आरोपावर टीका केली असून , यातून पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. सध्या सरकार जनतेचे कास्टिंग काऊच करत आहे अशी टीका सामनात केली आहे. काँग्रेस मधील रेणुका चौधरी यांनी वातवरण तयार करण्याचा प्रयत्न केला मात्र सफशेल फसला आहे. त्यांचा आरोप म्हणजे महिला वर्गाचा मोठा अपमान आहे. त्यांना आरोप करतांना संसदेचा अवमान केला आहे. रेणुकांची किंकाळी या मथळ्याच्या नावाखाली सामना मध्ये अग्रलेख लिहिला आहे. वाचा सामना मध्ये काय लिहिले आहे.
कास्टिंग काऊच सुरूच आहे;
संसदेत महिला खासदार आहेत तशा महिला अधिकारी व कर्मचारीही आहेत, पण ‘कास्टिंग काऊच’ची किंकाळी रेणुका चौधरींनी मारली आहे. त्यांच्या किंकाळीने फार तर त्यांच्या पक्षात खळबळ माजू शकेल. सध्याच्या सरकारात अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही कास्टिंग काऊच चालले आहे. तेलुगू देसमचे कास्टिंग काऊच झाले म्हणून चंद्राबाबू सरकारमधून बाहेर पडले. कास्टिंग काऊच राजकारणात फक्त महिलांचेच होते असे नाही. सध्याच्या काळात ‘निर्भय’ कोणीच नसल्याने दडपण सहन करीत अनेकांचे जगणे सुरू आहे.
काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांनी नेहमीप्रमाणेच काही फटाके फोडण्याचा प्रयत्न केला आहे, पण एक-दोन दिवसांच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या व सगळे हवेतच विरून गेले. रेणुका चौधरी यांनी असे सांगितले की, फक्त सिने उद्योगातच नाही, तर राजकारणातील स्त्रीयांनाही ‘कास्टिंग काऊच’चे शिकार व्हावे लागते. रेणुकाबाईंनी ‘संसदे’त महिलांचे कास्टिंग काऊच होते असा उल्लेख केल्याने थोडी खळबळ माजली. रेणुकांचे हे विधान बेजबाबदारपणाचे व समस्त महिलावर्गाचा अपमान करणारे आहे. रेणुका आधी तेलुगू देसम पक्षात होत्या व आता अनेक वर्षे त्या काँग्रेस पक्षात आहेत. खासदारकीपासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत अनेक जागांवर त्या विराजमान झाल्या. राज्यसभेतून आता त्या निवृत्त होताच त्यांना कास्टिंग काऊचची आठवण झाली. रेणुकांचे म्हणणे असे आहे की, कामाच्या ठिकाणी महिलांचे एक स्त्री म्हणून शोषण होतच असते. फक्त सिनेमातच नाही, तर संसदेतही हे घडते असा साक्षात्कार त्यांना झाला. हे सर्व संसदेत घडत असेल तर रेणुका आतापर्यंत गप्प का बसल्या? जर त्यांच्या डोळ्यांदेखत हे महिलांचे शोषण सुरू होते तर त्यावर त्यांनी संसदेत आवाज का उठवला नाही? राज्यसभेची जागा सोडावी लागल्यावरच त्यांना संसदेतील ‘कास्टिंग काऊच’चा सिनेमा का दिसला? संसदेच्या कोणत्या दालनात हे रेणुका म्हणतात त्याप्रमाणे कास्टिंग काऊच चालले आहे याचा खुलासा सर्वप्रथम काँग्रेसने करायला हवा.