Publish Date: Sat, 21 Nov 2020 (09:23 IST)
Updated Date: Sat, 21 Nov 2020 (09:24 IST)
शिवसेनेच्या भगव्यामध्येच भेसळ झाली आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व खरे होते. सध्या जो भगवा दिसतोय तो बाळासाहेबांचा भगवा नाहीच. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह लेखन करणाऱ्यांसोबत ते सत्तेत बसले आहेत. काश्मीरच्या गुपकार संघटनेत सहभागी असलेल्या काँग्रेसची साथ घेणारी शिवसेना आम्हाला काय सांगणार, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
युतीच्या काळातील थकीत वीज बिलाची चौकशी राज्य सरकार करणार आहे, याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, आधी वीजमाफीची घोषणा केली आणि आता तोंडावर पडले. हे अपयश लपवण्यासाठी सरकार थकीत बिलाच्या चौकशीची भाषा बोलत आहे. जी थकबाकी होती ती त्यांच्या काळातीलच होती. उलट आम्ही शेतकऱ्यांना आणि मागासवर्गीयांना वीज उपलब्ध करून दिली.