Publish Date: Wed, 20 Dec 2017 (09:13 IST)
Updated Date: Wed, 20 Dec 2017 (09:16 IST)
शालेय पोषण आहारासाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या धान्याचे बाजारातील दर व प्रत्यक्ष होणाऱ्या पुरवठ्यातील दर यामध्ये तफावत असेल तर त्याची चौकशी केली जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले. आमदार शरद सोनावणे, सुनिल प्रभू, सरदार तारासिंह, सुनिल केदार, ऍड. राहूल कुल यांनी रायगड जिल्ह्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
तावडे म्हणाले की, रायगड जिल्ह्यामध्ये आहार शिजवण्यासाठी बचतगटामार्फत धान्य आणि इतर मालाची खरेदी करण्यासाठी ऑगस्ट 2017 पर्यंत अनुदान जिल्हास्तरावर वितरीत करण्यात आले आहे. इंधन व भाजीपाला यासाठी लागणारे ऑक्टोबर 2017 पर्यंतचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तसेच शाळांमध्ये आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनासाठी डिसेंबर 2017 पर्यंत लागणारा निधी वितरीत करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील काही शाळांना तांदूळ पुरवठा उशीरा झाल्याने संबंधित पुरवठादाराकडून दंड आकारण्यात आला आहे. नोव्हेंबर 2017 पासून निविदा प्रक्रियेतून नियुक्त पुरवठादारामार्फत तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा नियमीतपणे करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.