Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
‘सर्वच बाबतीत भाजपच राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपशिवाय सत्तास्थापना होणं अशक्य आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या विजयी आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला’, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. वसंतस्मृतीमध्ये भाजपच्या तीन दिवसीय बैठक सुरु आहे.
‘१०५ आमदार आणि १४ अपक्ष अशा ११९ आमदारांना घेतल्याशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकत नाही. त्यामुळे भाजपचं नेतृत्व असलेलं सरकारच महाराष्ट्रात स्थापन होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे’, असं देखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
‘भाजपला या विधानसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त म्हणजे १ कोटी ४२ लाख तर दुसऱ्या क्रमांकाची मतं राष्ट्रवादी काँग्रेसला ९२ लाख मतं मिळाली तर शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकाची म्हणजेच ९० लाख आहेत. गेल्या वेळी २६० जागा लढवल्यानंतर ११२ जागा जिंकल्या, तर यावेळी १६४ जागा लढवल्यानंतर १०५ जागा जिंकल्या. सर्वाधिक महिला आमदार १२ भाजपच्या आहेत. अनुसूचित जातीचे सर्वाधिक ९ आमदार भाजपचे आहेत. बाहेरून आलेल्या २६ उमेदवारांपैकी १६ जण जिंकून आले आहेत.त्यामुळे एकंदरीत सगळ्याच आघाड्यांवर भाजप राज्यातला क्रमांक एकचा पक्ष आहे असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.