अजरामर गायक- रफीदा
Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
कवीच्या कल्पनेला मधुर आवाजात श्रोत्यांसमोर मांडणे म्हणजे कवितेला मूर्त स्वरूपच देणे होय. अशाच कविता, गीतांमध्ये मोहम्मद रफी ऊर्फ रफिदांनी प्राण ओतले. रफीदांनी 1944 पासून ते 1980 पर्यंत हिंदी चित्रपटामधील गीतांना आवाज दिला. जवळपास 1960 चित्रपटामधील 4518 गीते त्यांनी गायली. 24 डिसेंबर 1924 रोजी पृथ्वीवर आलेला हा तारा 31 जुलै 1980 रोजी तुप्त झाला. त्यानिमित्त.... रफीदांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पाकिस्तानातील कोटला सुल्तानसिंगमध्ये झाला. शिक्षण पूर्ण करून त्यांनी 1944 पासून 1980 पर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायक म्हणून काम केले. त्यांनी 1960 हिंदी चित्रपटांमधील 4518 गीते गायली. तर अन्य भाषांमधील 68 चित्रपटांमधील 112 गीतांना त्यांनी स्वर दिला. त्यांनी गायलेल्या गाण्यांचा पहिला रिलीज झालेला चित्रपट 'पहले आप'(1944) होता. यात 'हिंदुस्तान न के हम है, हिंदुस्तान हमारा है' हे देशभक्तिवर पहिले गीत सादर केले तर शेवटचे गीत 'आसपास' या चित्रपटासाठी रेकॉर्ड करण्यात आले होते. 'तेरे आने की आस है दोस्त...' असे त्या गीताचे बोल आहेत. रफीदांना 1967 मध्ये पद्मश्री देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना सहा फिल्मफेअर अवार्डदेखील मिळाले आहेत. अभिनेता शम्मी कपूर, राजेंद्र कुमार, जॉय मुखर्जी, धर्मेंद्र व राजेश खन्ना यांच्या चित्रपटातील गीतांना रफीदांनीच आवाज दिला. त्यांनी गायिलेल्या गीतांनी मधुबाला, वहिदा रहमान, शर्मिला टागोर, रेखा व मुमताज यांच्यासारख्या अनेक नायिकांना प्रसिध्दी मिळवून दिली. कारण रफीदांनी गायलेल्या गाण्यांत या नायिकांचे अप्रतिम वर्णन आले होते. ते वर्णन रफीदांनी आपल्या आवाजातून जिवंत केले. गीतकारांनी या नायिकांना कधी नाजुक फूल म्हटले त कधी चंचल हरीण, कधी रेशमी केस तर कधी गोरे गाल, कधी चंद्रासारखे तेज अशा उपमांनी सजलेली गाणी रफीदांनी अक्षऱशः जिवंत केली. त्यामुळे त्या नायिकांचे सौंदर्य प्रभावीपणे लोकांसमोर आले. रफीदांनी 'हम किसीसे कम नही' या चित्रपटात 'क्या हुआ तेरा वादा' अशी भावनांना साद घालताना 'सावन की घटा' या चित्रपटात 'ये रेशमी जुल्फे, ये शरबती आँखे' असे म्हणत ते रोमॅंटिकही झाले.गुरूवार, दि. 31 जुलै 1980 रोजी सकाळी वेळी त्यांना ह्दयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी दाखल करण्यात आले. त्याच रात्री 10 वाजून 25 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.