Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दरडी म्हणजे नेमकं काय? त्या कोसळतात कशा? जाणून घ्या…माळीण गावातील दरड दुर्घटना व इतर घटना ..एक रिपोर्ट

दरडी म्हणजे नेमकं काय? त्या कोसळतात कशा? जाणून घ्या…माळीण गावातील दरड दुर्घटना व इतर घटना ..एक रिपोर्ट
, शुक्रवार, 21 जुलै 2023 (15:01 IST)
खालापूर येथील इर्शाळगडाच्या (Irshalgad Fort) पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. या दरडीच्या (Landslide) मलब्याखाली 40 घरे दबली गेली आहेत. आतापर्यंत घटनास्थळावरून 8 पेक्षा जास्त मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना घडल्याने पुन्हा एकदा दरड कोसळण्याचा मुद्दा चर्चा चर्चेत आला आहे. पण ही दरड नेमंक कोसळते तरी कशी आणि कधी याची माहिती आता दिली जात आहे.
 
दरड म्हणजे नेमकं काय?
दरड म्हणजे डोंगराची तीव्र कडा. असे नैसर्गिक तीव्रकडा फारच कमी असतात आणि ज्या कठीण आहेत त्या दगडांच्या आहे. डोंगर फोडून लोहमार्ग किंवा रस्ता बनवताना, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दरडी तयार होतात. किमान एका बाजूला दरड राहते. डोंगरातून रस्ते बनवताना बहुतांश दरडी तयार झाल्या आहेत.
 
दरडी केव्हा कोसळतात?
दरडी नैसर्गिक आणि कृत्रिम कारणांनी कोसळतात. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी जमीन खचते म्हणजेच भूस्खलन होते. अशा भूस्खलनावेळी दरड नैसर्गिकरित्या कोसळते. अशा घटना अपवादात्मक आहेत. मोठ्या प्रमाणात मातीचा ढिग किंवा खडक फुटून कडा कोसळतो, त्यास दरड कोसळणे म्हणतात.
 
दगड किंवा भूभागाचे वजन वाढते अन्
नैसर्गिकरित्या कठीण पाषाणात असणाऱ्या भेगा किंवा फटी असतात. उन, वारा, पाऊस यांचा परिणाम होऊन खडकाचे तुकडे होतात. या भेगा वाढून त्यामध्ये पाणी साठले की दगडाचे किंवा भूभागाचे वजन वाढते आणि तो खडक उताराच्या बाजून घसरतो. ही नैसर्गिक दरड कोसळण्याची प्रक्रिया असते.
 
माळीण गावातील दरड दुर्घटना
दिनांक 30 जुलै, बुधवारची नुकतीच उजाडू लागलेली सकाळची वेळ, माळीण गावच्या डोंगरात स्फोटकसदृष्य आवाज झाला, मातीचा ढिगारा, चिखल व उन्मळलेली झाडे अचानक खाली घसरून येवू लागली. डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ गावातील 74 पैकी 44 घरे दाबली गेली. जवळजवळ संपूर्ण गाव क्षणार्धात गायब!
 
माळीण गाव पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील एक आदिवासी गाव. भिमाशंकर पासून 20 कि.मी आणि पुण्यापासून 75 कि.मी अंतरावर वसलेल्या या गावची 7 वाड्यासहित लोकसंख्या 715. मूळ गावामधील 74 घरांपैकी 44 घरे, त्यातील 150 ते 165 पुरूष, स्त्री, लहान मुले, गाई, म्हशी, शेळ्या सहित मातीच्या ढिगाऱ्याखाली. गावाचे हे दु:खद आणि विदारक चित्र, क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.

आहुपे - मंचर ही एस.टी. बस रात्री अबुपे मुक्कामी. ही बस सकाळी अतिदुर्गम आदिवासी आहुपे मुक्कामाचे गाव सोडून 7।। वाजेपर्यंत कोंढरे घाटापर्यंत पोहचली. तेथे एस.टी चालकाला माळीण गाव दरड कोसळ्याने मातीच्या ढिगाऱ्यात गायब झाल्याचे समजले. माळीण गाव परिसरात मोबाईल - इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने तेथील परिसरातील घडामोटींची देवाणघेवाण करणारी एस.टी बस हीच एकमेव सेवा. एस.टी बस जेथे उभी होती त्या कोंढरे घाटाच्या वरच्या बाजूस मोबाईल रेन्ज असल्याने बसचालकाने त्वरित आपल्या मंचर येथील भावाला, भावाने त्वरित भिमाशंकर सहकारी साखर कारखान्यास व कारखान्याने प्रशासनास सदर दुर्घटनेची माहिती पोहचविली.
 
एकसारखा दमदार पाऊस, अरूंद रस्ता, वाहनांची व बघ्यांची गर्दी व इतर अडचणींना तोंड देत पुण्याहून एनडीआरएफ (National Disaster Response Force) टीम 400 जवान, डॉक्टर्स, नर्सेस सहित माळीण येथे दाखल झाली. अहोरात्र प्रयत्नांती सहाव्या दिवसाखेर 121 मृतदेह बाहेर काढण्यात आले. सुरूवातीस 9 जणांचे प्राण वाचविण्यात यश आले. आणखी 40 - 50 मृतदेह मातीच्या ढिगाऱ्यात असण्याची शक्यता. डोंगर कोसळून एवढी मोठी क्षणार्धात झालेली जीवित हानीची राज्यातील ही पहिलीच दुर्घटना. माळीण गाव भूगोलाच्या नकाश्यावरून कायमचे पुसले गेले.
 
माळीण गावची ही दुर्घटना म्हणजे राष्ट्रीय आपत्ती. केंद्र सरकार, राज्य सरकार व इतर नावाजलेल्या संस्थांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. माळीण गावातील सर्व घरांचे व आजूबाजूच्या अन्य घरांचे पुनर्वसन, संसारउपयोगी वस्तू पुरविण्याचा निर्णय व मृतव्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन राज्य सरकारकडून झाले. अशा प्रकारच्या आपत्तीची पुनरावृत्ती होवू नये म्हणून संपूर्ण पश्चिम घाटातील धोकादायक परिसराचे व गावांचे शास्त्रीय सर्वेक्षण घेतले जाण्याचे व मृतव्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचे केंद्र सरकारकडून आश्वासन दिले गेले.
 
अशा दरड कोसळण्याच्या घटना महाराष्ट्रात यापूर्वीही झाल्या आहेत. अॅण्टाप हिल, मुंबई येथे 11 जुलै, 2005 रोजी दरडीखाली 5 ठार, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील 5 गावांमध्ये डोंगरकडा कोसळून 25 जुलै, 2005 रोजी 194 ठार तर 5 सप्टेंबर 2009 रोजी मुंबईतील साकीनाका येथे दरड कोसळून 12 ठार. तरीसुध्दा क्षणार्धात दरड कोसळून जवळजवळ संपूर्ण गाव मातीखाली गायब होण्याची माळीण दुर्घटना राज्यात पहिलीच.

या सर्व कारणांमुळे महाराष्ट्र राज्यात एसडीआरएफ सारखी ( State Disaster Response Force) यंत्रणा स्थापित करण्याचा निर्णय घेणारे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य होईल. एकट्या मुंबईत दरडीखाली राहणाऱ्यांची संख्या एक लाखाहून अधिक, 263 ठिकाणे, धोकादायक घोषित आहेत. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील गावांना दरडी कोसण्याचा धोका आहे. या जिल्ह्यांना अशा यंत्रणेकडून त्वरित निश्चितपणे मदत होईल.

दरम्यान 2 ऑगस्ट, 14 पासून भारतीय भूवैज्ञानिक पथकाने (Geological Survey of India) माळीण परिसराची प्राथमिक पाहणी करून प्रकर्ष जाहीर केले आहेत. त्यात माळीण दुर्घटनेमागे नैसर्गिक कारणे मुख्यत्वे जबाबदार असल्याचे नमूद केले आहे.

डॉ. सतीश ठिगळे भूस्खलन तज्ज्ञ यांनी भिमाशंकर परिसराच्या अभ्यासांती शेतीसाठी जमिनीचे सपाटीकरण व त्यासाठी केलेली जंगलतोड हे भूस्खलनाचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यातील लागोपाठ होणाऱ्या दरडी कोसळण्याच्या दुर्घटना लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाने केलेली कार्यवाही :
वन व पुनर्वसन विभागाची आदर्श संहिता
 
वन विभागाचे तत्कालिन सह सचिव श्रीनिवास राव यांच्या नेतृत्वाखाली 'दरड कोसळणे' या विषयावर माहिती घेवून एक अभ्यासपूर्ण 'आदर्श संहिता' तयार केली. अभ्यासांती खालील बाबी निदर्शनास आल्या.
 
महाराष्ट्र राज्याचा 15 टक्के भूभाग दरडप्रवण- नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यात दरडी कोसळण्याचा धोका.
या जिल्ह्यांच्या घाट परिसरात विशेष काळजी घेण्याची गरज
 
याशिवाय खालील बाबींचा आढावा घेवून दरड पडण्याची कारणे व त्यावरील उपाय आदर्श संहितेमध्ये सुचविण्यात आले.
 
दरड कशाप्रकारे पडू शकते ?
त्या पाठीमागे कारणे काय असू शकतील ?
दरडप्रवण क्षेत्र कसे ओळखावे ?
लोकसहभागातून आपत्ती निवारणांचे प्रयत्न
 अतिवृष्टीच्या वेळी ग्रामस्थांची व प्रशासनाची जबाबदारी आणि अहवालात सुचविलेले उपाय -
 
1. दरड प्रवण परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने समिती स्थापन करावी व पर्जन्यवृष्टीचा ट्रेंड कसा आहे याचा आढावा घ्यावा.
2. पाण्याचे नैसर्गिक प्रवाह सुस्थितीत आहेत काय तसेच डोंगरमाथ्यावर कोठे भेगा पडल्या आहेत याची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी.
3. संभाव्य अपघात टाळण्यासाठी तसेच हानीची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासनाकडून भिंत उभारणे, धोकादायक भागाला जाळी बसविणे व पाणी साचू नये यासाठीचे उपाय करावेत.
 
अतिवृष्टी, डोंगर रांगावर वाढते अतिक्रमण, त्यावर वस्ती होण्याचे वाढते प्रमाण, अतिक्रमण, डोंगरावरील खोदाई आदि कारणांमुळे दरड कोसळण्याचा धोका भविष्यात वाढणार. तसेच डोंगरावर कमी होत असलेली वृक्षसंपदा दरड कोसळण्याचे एक प्रमुख कारण संहितेमध्ये दर्शविले आहे.


Edited By - Ratnadeep ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Malshej Ghat : माळशेज घाटात दरड कोसळली, सुदैवाने जन हानी नाही, वाहतूक ठप्प