Publish Date: Mon, 11 Feb 2019 (14:33 IST)
Updated Date: Mon, 11 Feb 2019 (14:37 IST)
भारतातील पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित बनणारा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आहे. आतापर्यंत चर्चा होती की, या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनबरोबर बोलणे सुरू आहे, परंतु कार्तिकने हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगतानाच आपण राकेश शर्मा यांच्या चित्रपटाचा हिस्सा नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारतातील पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यावर बनणारा बायोपिक गेल्या काही काळापासून चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाची चर्चा यामध्ये शाहरूख खान येणार असल्याची बामती आल्यानंतर जास्तच वाढली होती. झीरो चित्रपटादरम्यान शाहरूख चित्रपटाविषयी भरभरून बोलत होता, परंतु झीरोच्या अपयशानंतर शाहरूख कोणताही नवा प्रयोग करण्यास इच्छुक नाही. त्यामुळे यापुढे ज्या चित्रपटाच्या यशाविषयी त्याला पूर्ण खात्री वाटेल त्याच प्रोजेक्टचा हिस्सा बनण्याचे शाहरूखने ठरवले आहे. राकेश शर्मांच्या या बायोपिकची ऑफर सर्वात आधी आमिर खानला देण्यात आली होती. आमिरने या कथेविषयी शाहरूखबरोबर चर्चा केली. आमिरचे ऐकून शाहरूख या चित्रपटात काम करण्यास तयारही झाला होता. शाहरूख चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनच्या नावाचीही जोरदार चर्चा झाली. या दरम्यान या चित्रपटासाठी विक्की कौशलचे नावही पुढे आले होते, परंतु आता कार्तिकने आपण या चित्रपटाचा हिस्सा नसल्याचे स्पष्ट केले आहे. कार्तिक म्हणाला, प्रदीर्घ काळापासून मी ऐकत आहे की, मी कुठल्या तरी स्पेस फिल्ममध्ये काम करणार आहे, जे मुळात खरे नाही. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक महेश थाई यांनी कार्तिक आर्यनबरोबर चर्चा देखील केली होती.