Publish Date: Sat, 10 Apr 2021 (10:16 IST)
Updated Date: Sat, 10 Apr 2021 (10:18 IST)
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम दिलासात शुक्रवारी वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांना अलिबाग सत्र न्यायालयात उपस्थित राहण्यापासूनही वगळण्यात आले.
अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितीश सारडा यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. आरोपीनी थकीत पैसै न दिल्याने मे 2018 मध्ये नाईक यांनी आत्महत्या केली होती. गुन्हा रद्द करण्यासाठी व त्यानंतर दाखल केलेले दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी आरोपीनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवरील सुनावणी न्या. संभाजी शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे होती.
या तिघांनीही अलिबाग न्यायालयात उपस्थित राहण्यापासून वगळावे अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. 5 मार्च रोजी उच्च न्यायालयाने या तिघांना 16 एप्रिलपर्यंत अलिबाग न्यायालयात सुनावणीस अनुपस्थित राहण्याची मुभा दिली होती. मात्र, 16 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाचे कामकाज सुरू राहणार नसल्याने गोस्वामी व अन्य दोघांनी मुदतवाढ मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. अलिबाग न्यायालयात पुढील सुनावणी 26 एप्रिल रोजी होणार असल्याने तोपर्यंत अंतरिम दिलासा द्यावा, अशी विनंती गोस्वामी यांच्या वकिलांनी न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने गोस्वामी यांच्या याचिकेवर 23 एप्रिल रोजी ठेवत तोपर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे.
webdunia
Publish Date: Sat, 10 Apr 2021 (10:16 IST)
Updated Date: Sat, 10 Apr 2021 (10:18 IST)