Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यातून सुमारे अडीच लाख परप्रांतीय नागरिक उत्तरेकडील त्यांच्या मूळ गावी रेल्वेने रवाना

पुण्यातून सुमारे अडीच लाख परप्रांतीय नागरिक उत्तरेकडील त्यांच्या मूळ गावी रेल्वेने रवाना
, मंगळवार, 27 एप्रिल 2021 (09:55 IST)
पुण्यात आतापर्यंत सुमारे अडीच लाख नागरिक उत्तरेकडील त्यांच्या मूळ गावी रेल्वेने रवाना झाले आहेत. त्यात प्रामुख्याने मजूर-कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. उत्तरेकडील गाडय़ांना वाढती मागणी आणि प्रतीक्षा यादी लक्षात घेता पुणे रेल्वेकडून विशेष आणि अतिरिक्त गाडय़ांचे नियोजन करण्यात आले. अद्यापही मागणी कमी झाली नसल्याने महिनाअखेपर्यंत आणखी १५ अतिरिक्त गाडय़ा नियोजित करण्यात आल्याचे पुणे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.
 
पुण्यात करोनाच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना स्थानिक प्रशासनाने १ एप्रिलपासूनच शहर आणि जिल्ह्य़ात निर्बंध लागू केले. त्यामुळे गाडय़ांची मागणी अचानक मोठय़ा प्रमाणावर वाढली. त्यामुळे विशेष अतिरिक्त गाडय़ांचे नियोजन करण्यात आले. त्यात पुणे स्थानकावरून दानापूर (पटना), भागलपूर (बिहार), गोरखपूर, लखनौ आदी भागांत अतिरिक्त गाडय़ा सोडण्यात आल्या १ तारखेपासून ३२ ते ३५ गाडय़ा या भागांत रवाना करण्यात आल्या आहेत.
 
अतिरिक्त गाडय़ांसह उत्तरेकडील राज्यांमध्ये महिन्यापासून विशेष नियमित गाडय़ांनाही मोठी मागणी आहे. पुणे स्थानकातून जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस, आझाद हिंदू, गोरखपूर, दामापूर, मंडुअडिहा आदी ठिकाणी दररोज गाडी सोडण्यात येत आहे. महिन्यापासून या सर्व गाडय़ा पूर्ण क्षमतेने प्रवासी घेऊन जात आहेत. अतिरिक्त आणि विशेष गाडय़ा बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या मोठी मागणी असलेल्या तीन राज्यांतील प्रवाशांना उपयुक्त ठरतील, असे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गाडीत सुमारे १४०० प्रवाशांसाठी आसनक्षमता असून, त्यानुसार महिन्यात अडीच लाखांच्या आसपास नागरिक उत्तरेकडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बेस्ट कर्मचारी विश्रांतीगृहात १ हजार पंखे आणि २०० कुलर्स तातडीने उपलब्ध करा