Publish Date: Wed, 23 Feb 2022 (15:27 IST)
Updated Date: Wed, 23 Feb 2022 (15:27 IST)
सुप्रीम कोर्टानं दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. सर्व राज्यांचे बोर्ड, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती ए एम खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि सीटी रविकुमार यांनी ही याचिका फेटाळली आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसंर्ग झाल्यामुळं परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता., असं निरिक्षण देखील सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे.
दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द कराव्यात यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.ऑफलाईन परीक्षांना विरोध करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं भाष्य केलं आहे. परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिका या विद्यार्थ्यांमध्ये चुकीच्या आशा निर्माण करतात. न्यायालयांनी अशा प्रकारच्या याचिकांची दखल घेतल्यास यंत्रणांमध्ये संभ्रम निर्माण होतो. या कशा प्रकारच्या याचिका आहेत, असा सवाल देखील सुप्रीम कोर्टानं विचारला आहे. संबंधित यंत्रणांना निर्णय घेऊ द्या, असं मत देखील सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आहे.