Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वटपौर्णिमा संपूर्ण माहिती Vat Purnima Information In Marathi

Webdunia
हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते.
 
या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतिला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य, मुले-बाळं, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे, असे वटपौर्णिमेला गाऱ्हाणे घालतात.
 
वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायवयचे असते. तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहेत. तरी तीन दिवस व्रत- उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा.
 
या व्रताचा विधीत नदीकाठची वाळू आणून पात्रात भरुन तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाल्या जातात मग त्यांची षोडशोपचारे पूजा केली जाते. त्यानंतर पाच अर्धे घ्यावीत, मग सावित्रीची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी.
 
वटपौर्णिमा व्रत पूजा साहित्य आणि विधी
वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काही लागणारे साहित्य- 
 
हळद- कुंकू, सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती, धूप, दीप, उदबत्ती, निरांजन, पाच प्रकारची फळं, फुले, दिवा ठेवण्यासाठी रोवळी, वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, पाणी भरलेला लहान कलश, 
पंचामृत, हिरव्या बांगड्या
 
वटपौर्णिमेचा पूजा विधी
सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिंनीनी सौभाग्यलंकार परिधान करून देवाची प्रार्थना, तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र व्हावं.
वटसावित्री व्रताचा संकल्प करावा.
षोडशोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी.
बांबूच्या दोन टोपल्या घ्या, एका टोपल्यात सात प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवा.
माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवावी आणि धूप, दिवा, अक्षत, कुमकुम, माऊली इत्यादी पूजेचे साहित्यही ठेवावे.
माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधावा.
पंचामृत नेवैद्य म्हणून दाखवा. 
यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दान-दक्षिणा द्यावी.
पूजेनंतर महिलां एकमेकींना आंब्याचे वाण देतात.
या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी.
सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा.
 
प्रार्थना
सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.
 
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
 
वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।। अशीही प्रार्थना केली जाते.
 
वटपौर्णिमा विषयी पौराणिक कथा
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.
 
सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.
 
पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
 
सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

दारिद्र्य दहन शिव स्तोत्र आणि अर्थ

रामदास स्वामींची आरती Samarth Ramdas Aarti

श्री रामदास नवमी 2024 : कोण होते समर्थ गुरु रामदास स्वामी

महाशिवरात्री महाउपाय, निश्चितच ऐश्वर्य लाभेल

द्वारिका धाम बद्द्ल 5 मनोरंजक गोष्टी

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments